दिवसभरात अनेक गावांना भेटी देऊन आढावा घेणार
जयसिंगपूर/ प्रतिनिधी
धरण क्षेत्रात व इतरत्र पावसाने काल रात्रीपासून थोडी विश्रांती घेतल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे महापुराचा धोका टळला आहे असे म्हणता येणार नाही, खबरदारी म्हणून नागरिकांनी आणखी दोन दिवस सतर्क राहावे असे आवाहन करत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी सकाळपासून पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिरोळ तालुक्याच्या दौऱ्याला सुरुवात केली.
सकाळच्या सत्रात चिंचवाड, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड, हसुर व शिरटी या गावांना भेटी देऊन राज्यमंत्री यड्रावकर पूर परिस्थितीची पाहणी करतील, मागील दोन दिवस मंत्री यड्रावकर यांनी तालुक्यातील महापुरा बाबत संवेदनशील असलेल्या अनेक गावांना भेटी देत संबंधित गावातील नागरिकांना आधार देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत. प्रशासन त्याचबरोबरच शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पार्वती सहकारी सूतगिरणी कुरुंदवाड या संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच प्रशासन गतिमान झाले असून अनेक गावांमधील नागरिकांना गावागावातील पशुधनासह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे.