रविवारी सकाळी 9 वा. पासून 24 मे पर्यंत अमलबजावणी : पालन न करणाऱयांवर होणार कडक कारवाई,जनतेने सहकार्य करावे
प्रतिनिधी / पणजी
कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकारने उद्या रविवार 9 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून राज्यस्तरीय संचारबंदी लागू केली असून ती 15 दिवस म्हणजे 24 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कायम रहाणार आहे. त्या काळात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत खुली रहातील. वरील कालावधीतील लग्ने, वाढदिवस, मुंजी, साखरपुडा असे गर्दी होणारे सोहळे सर्वानी रद्द करावेत आणि संचारबंदीचे कडक पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
डॉ. सावंत यांनी राज्यातील जनतेसाठी केलेल्या ऑनलाईनवर संबोधनात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली. त्याची तपशीलवार अधिसूचना राज्याचे दोन्ही जिल्हाधिकारी आज शनिवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत जारी करणार असून त्यात काय सुरू असणार, काय बंद राहणार, याचे स्पष्टीकरण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
लसीकरण, आरोग्य केंद्रे सुरुच राहणार
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की खाद्यपदार्थ देणारी हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत फक्त पार्सल देण्यापुरतीच चालू रहातील. संचारबंदीच्या काळात लसीकरणाचे काम तसेच आरोग्य केंद्रे चालूच रहाणार असून विनाकारण गरज नसताना फिरणाऱयांवर पोलिसांची कारवाई होणार असल्याचा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे. सरकारी व खासगी इस्पितळे चालूच रहाणार असून तेथे काम करणाऱयांना संचारबंदीत कोणी अडवू नये असे डॉ. सावंत यांनी सुचित केले आहे.
कडक संचारबंदी करण्याशिवाय गत्यंतर नाही
लोकांनी जर कोरोनाचे नियम, अटी पाळून काळजी घेतली असती तर एवढय़ात मोठय़ा संख्येने बळी गेले नसते व बाधितही झाले नसते. परत परत सांगून लोकांनी बाहेर विनाकारण फिरणे चालूच ठेवल्यामुळे आता कडक संचारबंदी करण्याशिवाय गत्यंतर राहीले नाही, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
जनतेने आता तरी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे
सध्या शैक्षणिक संस्था बंद आहेत. तरी देखील 25 वर्षापर्यंतचे लोक बाहेर मोठय़ा प्रमाणात फिरताना दिसतात. अनेकजण मास्क लावत नाहीत, सामाजिक दुरी पाळत नाहीत. त्यामुळे गोव्यात कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर वाढला असा दावा डॉ. सावंत यांनी केला. सर्व जबाबदारी सरकारवर टाकता येत नाही व टाकू नये, तर आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे याचे भान जनतेने ठेवण्याची गरज आहे असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
दहावी, बारावी परीक्षांबाबत मंडळ निर्णय घेणार
दहावी, बारावी परीक्षांबाबत गोवा बोर्ड निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
वेळेवर उपचार केले तर कोनोरा बरा होतो
वेळेवर उपचार केले तर कोनोरा बरा होतो असे सांगून डॉ. सावंत म्हणाले की लोकांनी लक्षणे दिसताच तातडीने औषधे सुरू करावीत व चाचणी करून घ्यावी त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि चाचणी न करता औषधे न घेता घरीच रहातात. मग प्रकृती बिघडली की हॉस्पिटलकडे धाव घेतात. हे सर्व टाळायचे असेल तर कोरोना रुग्णांनी त्वरित कार्यवाही करण्याची गरज डॉ. सावंत यांनी प्रकट केली.
राज्यात ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा नाही
गोव्यातील सर्व सरकारी, खासगी इस्पितळात ऑक्सिजन तसेच इतर औषधांचा पुरेसा साठा असून कुठेही तुटवडा नसल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. सरकारने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे काम केले असून जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
‘होम आयसोलेशन’ कालावधी 10 दिवसांवर
कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी 17 दिवसांवरुन 10 दिवसांवर आणण्यात आला असून तो कालावधी संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य खात्याने केले आहे. तशा आशयाची अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सदर नवीन मार्गदर्शक तत्वे होम आयसोलेशनसाठी जाहीर केली आहेत. या आधी कोरोना रुग्ण सापडला आणि पॉझिटिव्ह मिळाला तर त्याला 17 दिवस होम आयसोलेशन देण्यात येत होते. आता ते 10 दिवसच मिळणार आहे.
‘कर्फ्यु’बद्दल जनतेत संभ्रमावस्था
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘लॉकडाऊन’ हा शब्द न वापरता ‘कर्फ्यु’ (संचारबंदी) हा शब्द प्रयोग केल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यावर टीका केली तसेच पूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज वर्तवली. त्या टीकेची दखल घेऊन ‘राज्यस्तरीय कर्फ्यु’ हा ‘लॉकडाऊन’पेक्षा अधिक कडकपणे राबवला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ‘संचारबंदी’ जाहीर केल्यानंतर सरकारी, निमसरकारी तसेच खासगी उद्योगांमधील कर्मचारी, अधिकारी यांनी कामावर यावे की नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता डॉ. सावंत यांनी केली नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे आणि तो वर्ग संभ्रमात सापडला आहे.