भीती न बाळगण्याचे नागरी पुरवठामंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
रेशन वितरणास आठ दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली असून प्रत्येकाला रेशन मिळेल याची हमी सरकारने दिली आहे. त्यामुळे रेशनसंबंधी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात कुठेही लॉकडाऊन नाही. त्याचबरोबर सर्व अत्यावश्यक सेवा कर्फ्यूतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे कडधान्य वाहतुकीवर कोणतीही बंधने आलेली नाहीत. सर्व राज्यांना कडधान्य पुरवठा सुरळीत होत आहे. रेशन सोसायटय़ांना देण्यात येणारा मासिक कोटा प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेपर्यंत देण्यात येतो. मे महिन्यात ती मुदत आणखी आठ दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. असे असले तरीही त्याचा पुढील महिन्याच्या वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे लोकांनी कोणतीही घाई करू नये.
गत वर्षी लॉकडाऊन असतानाही सरकारने कोणतीही व्यक्ती धान्य वितरणापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. त्यातून काहींना त्यांच्या घरापर्यंतसुद्धा धान्य पोहोचविले होते. यंदा तर लॉकडाऊन करण्यातच आलेले नाही. गोव्याला 5300 मेट्रीक टन धान्य दरमहा कोटा प्राप्त होतो. सध्या जून महिन्याचा कोटाही राज्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे गोडाऊन्स फुल्ल झालेले आहेत. हा कोटा सर्वांना पुरेल एवढा मुबलक आहे. त्यामुळे रेशनवरील धान्य मिळण्यापासून कुणीही वंचित राहणार नाहीत. तशी भीती कुणीही बाळगू नये असे गावडे यांनी सांगितले.
दरम्यान, अन्य एका प्रश्नावर बोलताना राज्यात सध्या चालू असलेला कर्फ्यू 30 मे पर्यंत वाढविण्यात यावा, असे आपणास वाटते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.