पारनेर/प्रतिनिधी
राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र व राज्य सरकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाही.त्यामुळे राज्यात सक्षम लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,की राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. त्यासाठी आंदोलन करू. तसेच केंद्रीय लोकपाल, लोकायुक्त कायद्यातील तरतुदीनुसार,केंद्रात लोकपाल कायदा लागू झाल्यापासून एक वर्षांच्या आत देशातील सर्व राज्यांनी लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करणे बंधनकारक आहे. असे असताना ज्या महाराष्ट्रातून ऐतिहासिक लोकपाल, लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन सुरू झाले, त्या महाराष्ट्रात अद्याप लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा झालेला नाही. त्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
युती सरकारच्या काळात ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ असे ७ दिवसांचे उपोषण केले. त्या वेळी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तत्कालीन सरकारने निर्णय घेऊ न मसुदा समिती नेमली. या समितीच्या आजपर्यंत ६ बैठका झाल्या. त्यानंतर मात्र कोरोना संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बैठक झालेली नाही, असे हजारे यांनी म्हटले आहे.