कोरोनाच्या फैलावास सरकार जबाबदार : युवक काँग्रेसचा आरोप, चेकनाके बंद करण्याची मागणी करत पोळे चेकनाक्यावर निदर्शने
प्रतिनिधी / काणकोण
गोव्यात कोरोनाचा फैलाव व्हायला भाजप सरकार जबाबदार आहे. हे सरकार आंधळे आणि बहिरे झालेले असून असंवेदनशील बनलेले आहे, असा आरोप करत प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 17 रोजी पोळे चेकनाक्यावर निदर्शने केली. पोळे चेकनाका अत्यावश्यक वस्तू आणि बाहेर अडकून पडलेले गोमंतकीय वगळता अन्य वाहनांसाठी बंद करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारी आकडा जरी कमी दाखविण्यात येत असला, तरी आतापर्यंत गोव्यात कोरोनाबाधितांचा आकडा 629 वर पोहोचला असून याला गोव्याचे सरकार आणि प्रशासन जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, अमरनाथ पणजीकर, वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी केला.
राज्यातील भाजप सरकारला गोव्याची काळजी नाही. गोव्यातील सर्व चेकनाके बंद करावेत, त्या ठिकाणी जलद चाचणी सेवा उपलब्ध करण्यात यावी, सुरक्षित वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात याव्यात, कदंबचालकांना फिरायला बंदी घालण्यात यावी अशा मागण्या युवक काँग्रेस गेल्या कित्येक दिवसांपासून करत आहे. पत्रादेवी चेकनाक्यावर त्या ठिकाणच्या उपजिल्हाधिकाऱयांना जे निवेदन दिले होते त्यातील मागण्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. एवढेच नव्हे, तर काणकोणच्या उपजिल्हाधिकाऱयांना त्याची प्रत देण्यात आलेली नाही. चेकनाक्यांवर काम करणारे पोलीस, अबकारी, वन खात्यांचे व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी तसेच विशेष दंडाधिकारी यांना त्वरित सुरक्षित वैद्यकीय कीट देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करतानाच सरकारला शक्य नसेल, तर तो खर्च सोसण्याची तयारी युवक काँग्रेसने ठेवली आहे, असे पणजीकर यांनी जाहीर केले. याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल यांना निवेदन सादर करण्यात आले.
पैसे घेऊन लोकांना सोडले जाते
चेकनाक्यावरून सरळ पैसे घेऊन परराज्यांतील लोकांना गोव्यात प्रवेश दिला जातो, असा आरोप म्हार्दोळकर यांनी केला. जे लोक चेक नाक्यावरून गोव्यात येतात ते पुढे कोठे जातात याचा अहवाल सरकारकडे नाही. कसल्याच गोष्टीवर नियंत्रण नाही. सरकार अकार्यक्षम बनलेले आहे. या सर्व गोष्टींचा अहवाल असल्यास तो सादर करावा, असे जाहीर आव्हान यावेळी त्यांनी दिले.
मंत्र्यांकडून खबरदारीच्या उपायांना तिलांजली
कोविड-19 च्या महामारीमुळे लॉकडाऊन असताना सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली देत, मास्क न वापरता गोव्याचे मंत्री विविध कार्यक्रमांत जाहीर उद्घाटने करतात आणि गोव्याच्या हितासाठी न्याय्य मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र अटक केली जाते, असा आरोप भंडारी यांनी यावेळी केला. प्रदेश काँग्रेसचे सचिव व माजी नगराध्यक्ष महादेव देसाई, जिल्हा सचिव पराग रायकर, उबेद, साईश सारलोस्कर, जिल्हा पंचायत निवडणुकीतील पैंगीण मतदारसंघातील उमेदवार रेश्मा वेळीप, युवक काँग्रेसचे प्रलय भगत, मिथील च्यारी, नवदीप फळदेसाई, सर्वानंद कोमरपंत, सायमन फर्नांडिस, जेसन फर्नांडिस, रजत च्यारी आणि अन्य कार्यकर्त्यांनी या निदर्शनात भाग घेतला.
प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोळे चेकनाक्यावर निदर्शने करणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी दक्षिण गोव्यातील पोलीस यंत्रणा या चेकनाक्यावर सज्ज झाली होती. उपअधीक्षक किरण पौडवाल यांच्या नेतृत्वाखाली केपेचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई, कुडचडेचे निरीक्षक रवी देसाई, काणकोणचे निरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक रमेश शिरोडकर, धीरज देविदास, रामचंद्र नाईक, गुन्हा अन्वेषण विभागाचे साहाय्यक उपनिरीक्षक सूर्यकांत सावळ आणि 150 पेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी तैनात होते. मात्र युवक काँग्रेसची ही निदर्शने शांततापूर्णरीत्या पार पडली. सरकारला जाग येईपर्यंत यापुढे अन्य चेकनाक्यांवर देखील निदर्शने करण्यात येणार असल्याचे भंडारी यांनी स्पष्ट केले.