ऑनलाईन टीम
राज्यात कडक निर्बंध लादणार आहे. एक दोन दिवसात त्याबाबत नियमावली जाहीर करण्यात येईल. मात्र, सध्या लॉकडाऊन नाही, तसा विचारही नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी यंत्रणा तयार आहे. महाराष्ट्राने फिल्ड हॉस्पिटल उभारली आहेत. परंतु, अशी अवस्था सुरू राहिल्यास सुविधा कमी पडू शकतात. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या लॉकडाऊनची गरज नाही. तो उपायही नाही. मात्र, रुग्णसंख्या याच गतीने वाढत राहिल्यास लॉकडाऊन सारखा निर्णय घ्यावा लागू शकतो, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्राने एकही रुग्ण लपवलेला नाही. अनेक कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात आहेत. त्यामुळे कोरोना काळात राजकारण करू नये. रस्त्यावर उतरायचं असेल तर उतरा पण ते नागरिकांना मदतीसाठी उतरा, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. सध्या राज्यात दररोज अडीच लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष आहे. तसेच लसीकरणातही महाराष्ट्र अव्वल आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.