गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने राज्याबाहेरही महाविकासआघाडी करण्याचा प्रयोग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उपद्रव मूल्य वाढवण्याचाच प्रयोग असून त्यामुळे भाजप अस्वस्थ तर काँग्रेस चिंताग्रस्त आहे.
गोव्यात शिवसेनेची नोटा बरोबर स्पर्धा आहे. इथे कोणत्या मतदारसंघात डिपॉझिट वाचेल याचा विचार सेना करत आहे अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात केली आहे. ही टीका करण्याचे कारण, भाजप अस्वस्थ झाला आहे हे तर आहेच पण गेल्या निवडणुकीत रा.स्व.संघातील नाराजांना घेऊन शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांना यश न लाभल्याची त्याला पूर्वपीठिकाही आहे. पण, दादरा व नगर हवेलीमध्ये लोकसभेची निवडणूक जिंकून शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दूरवरून येऊन आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस जर नशीब आजमावत असेल तर आपण प्रयोग का करू नयेत? त्यातून किमान भाजपला डिवचता तर येईल असा शिवसेनेचा हिशोब असणार हे तर नक्कीच आहे. उत्तर भारतात जेव्हा ते जातात किंवा तेथे जाऊन बोलतात तेव्हा मात्र भाजप खूपच अस्वस्थ होतो. राम मंदिर प्रश्नावर ‘तारीख नही बतायेंगे’ अशी टीका केल्यावरच भाजप शिवसेनेशी वाटाघाटीला तयार झाला होता. त्यामुळे राज्यातील भाजपच्या कारवाया थांबवायच्या असतील तर त्यासाठीचे वेसन महाराष्ट्रा बाहेरूनच मागवावे लागते हे शिवसेनेला बऱयापैकी माहीत झालेले आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याची, अयोध्या ऐवजी मथुरेतून प्रचाराचा शुभारंभ करण्याची घोषणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी नेते राकेश टीकेत यांच्याशी संजय राऊत यांची भेट आणि उद्धव ठाकरे यांची दूरध्वनीवरून चर्चा हे सगळे प्रयोग शिवसेना अत्यंत आक्रमकपणे करत आहे.
ज्ये÷ नेते शरद पवार यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यापेक्षा वेगळे आहे. संसदीय राजकारणातील मुरब्बी म्हणून ओळख असणाऱया पवारांना संपूर्ण देशात भाजपच्या विरोधात एकी करून दाखवली हे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी त्यांनाही महाविकास आघाडीचा प्रयोग आपण संपूर्ण देशात राबवण्याचा प्रयत्न करत आहोत हे दाखवून द्यायचे आहे. म्हणूनच बिहार, पश्चिम बंगालमध्ये ते लालूप्रसाद यादव आणि ममता यांच्यासाठी गेले. केरळमध्ये डाव्यांना साथ दिली. याचा लाभ होऊन त्यांना तेथे आपले आमदार निवडून आणता आले. पूर्वी जमवून ठेवलेले ओबीसी नेते पुन्हा एकत्र आणता आले. वैशिष्ट म्हणजे हे सर्व घडत असताना पवार, काँग्रेसला घेतल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर एकी होऊ शकत नाही हे सुद्धा अगदी स्पष्टपणे बोलत असतात. आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने भाजपला कडवे आव्हान दिले असताना, पवारांनी तिथल्या ओबीसी नेत्यांना बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन दिले असे वाटावे इतके ठाम वक्तव्य ते करत आहेत. भाजपच्या सत्तेतील तीन मंत्र्यांबरोबरच 13 आमदार बाहेर पडतील असे वक्तव्य त्यांनी केले आणि त्यातील तीन मंत्र्यांसह सहा आमदार समाजवादी पक्षाला जाऊन मिळालेही. ज्या पद्धतीचे वातावरण भाजपने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने युपीबाबत देशभर केले होते, त्याला जोराचा धक्का लावणाऱया या घटना आहेत. पण, पवार त्या ठामपणे बोलून दाखवत होते. आताही त्यांनी पुढचा घाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. जर छोटय़ा छोटय़ा ताकदी एकत्र आल्या तर मोठे व्यक्तिमत्त्व सुद्धा काही करू शकत नाही असे सांगत त्यांनी येणाऱया लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव हा प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीतून अचूक होऊ शकतो हे पुन्हा एकदा सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तसे देशात घडू शकते, आपण ते करु शकतो यावर विश्वास बसवण्याचे काम पवार करत आहेत. बंगाल, केरळमध्ये ते यशस्वी झालेत. उत्तर प्रदेशात ते सिद्ध व्हायचे आहे. त्यांचा हा आक्रमक अवतार भाजपलाही अनपेक्षित असावा!
सरकारला न्यायालयाचे फटके
भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबन प्रश्नावर न्यायालयाने राज्य सरकारला जोराचा फटका दिला आहे. वर्षभरासाठी निलंबन म्हणजे मतदारांवर अन्याय असून 60 दिवसावर निलंबन नको अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे. अंतिम निकालात न्यायालय हे निलंबन रद्द करणार की विधिमंडळाला निर्देश देणार? हे पहायचे. मात्र न्यायालयानेही राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणाची दखल घेतली आहे, हे निश्चित. निलंबित पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनाही न्यायालयाने यंत्रणेवर अविश्वास दाखवल्याबद्दल सुनावले आहे. ओबीसी आरक्षण आणि एसटी प्रकरणातही न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन राज्य सरकारने सुधारणा सुरू केली आहे. एसटीबाबत पवारांनी मध्यस्थीचा प्रयत्न करणे आणि ओबीसीचा वस्तुनि÷ डाटा गोळा करण्याचे काम सुरू करणे याला महत्त्व
आहे.
अर्थात प्रयत्न करणे आणि प्रश्न सुटणे यात खूप अंतर आहे. पण तोंडावर असणाऱया महापालिका निवडणुकांच्या आधी यातून सावरण्याचा प्रयत्न दिसून येऊ लागला आहे. मराठी पाटय़ा, त्यावर इतर भाषांना मुभा, मराठीतून इंजिनियरिंग शिक्षण, पाठ्यपुस्तकातून मराठी आणि इंग्रजी भाषेला चालना, कोस्टल रोडच्या बोगद्याची कामे, मुंबै बँकेत राष्ट्रवादी-शिवसेनेची भाजपला धोबीपछाड यातून कुठेतरी मुंबई डोळय़ासमोर ठेवून दोघे रणनीती आखत असल्याचे दिसत आहे.
शिवराज काटकर