कमाल 50 लाख रुपयांपर्यंत मिळणार अर्थसहाय्य
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पद्धतीने अर्थसहाय्य देऊन स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेमध्ये उत्पादन व प्रक्रिया उद्योगांसाठी कमाल 50 लाख रुपये व सेवा, कृषी पूरक उद्योगांसाठी कमाल 10 लाख रुपये अर्थसहाय्य मिळणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांनी दिली.
युवकांच्या सृर्जनशीलतेला वाव मिळून स्वयंरोजगारासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे. याद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागात सुक्ष्म, लघु उपक्रमातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावण्याचाही उद्देश या योजनेमध्ये आहे.
या योजनेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार हा राज्याचा रहिवासी असावा, तो 18 ते 45 या वयोगटातील असावा, अनुसुचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी वयाची अट पाच वर्षांसाठी शिथील आहे. 10 लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची अट नाही, तर 10 लाख रुपयांवरील उपक्रमांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही 7 वी पास आहे. 25 लाख रुपयांवरील प्रकल्पांसाठी उमेदवार किमान 10 वी पास असावा. अर्जदाराने यापूर्वी राज्य, केंद्र शासनाच्या कोणत्याही अनुदान समाविष्ट असलेल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
या योजनेसाठी नकारात्मक यादीतील उद्योग वगळता सर्व उत्पादन व प्रक्रिया उद्योग तसेच सेवा, कृषी पूरक उद्योग पात्र असणार आहेत. नकारात्मक यादीतील उद्योग पुढीलप्रमाणे आहेत. प्रदूषणकारी उद्योग, प्लास्टिक पिशवी निर्मिती, तंबाखू, सिगारेट, मद्य, मांस प्रक्रिया, वाहतूक सेवा, (ई-वाहने वगळून) नर्सरी, डेअरी, पोल्ट्री, पिगरी, गोटरी, मधुमक्षिका पालन, सेरिकल्चर इत्यादी.
या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी maha-cmegp.gov.in हे विशेष पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज करताना स्पॉन्सरिंग एजन्सी (Sponsoring Agency) या रकान्यामध्ये डीआयसी हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज परस्पर संकेतस्थळावर दाखल करावेत.
अधिक माहितीसाठी इच्छूक उमेदवारांनी जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 02362-228705 किंवा ई-मेला didic.sindhudug@maharashtra.gov.in वर संपर्क साधवा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राने केले आहे.