प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारी कर्मचाऱयांना 1 जुलैपासूनच लागू होईल याप्रमाणे महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. बुधवारी राज्य सरकारने यासंबंधीचा आदेश दिला आहे. सरकारी कर्मचाऱयांच्या मूळ वेतनाच्या 21.50 टक्के असणारा महागाई भत्ता 24.50 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱयांना दिवाळीआधीच खूषखबर मिळाली आहे.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्के केला होता. आता राज्य सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना आणि राज्य संचित निधीतून निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱया अनुदानित शिक्षण संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱयांनाही भत्तावाढ लागू असणार आहे.
सरकारी आणि जिल्हा पंचायतींमधील पूर्णवेळ कर्मचाऱयांना, सरकारचे अनुदान घेणाऱया शिक्षण संस्थांमधील कर्मचारी आणि विद्यापीठांमधील पूर्णवेळ कर्मचाऱयांनाही भत्तावाढीचा आदेश लागू असणार आहे. युजीसी/ एआयसीटीइ/ आयसीएआर/ एनजेपीसीच्या वेतन श्रेणीनुसार वेतन घेत असलेले कर्मचारी आणि एनजेपीसी पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तावाढीसंबंधी स्वतंत्रपणे आदेश जारी करण्यात येईल, अशी माहिती अर्थखात्याने दिली आहे.
तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलैमध्ये राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 11.15 टक्क्यांवरून 21.50 टक्क्यांपर्यंत वाढविला होता. आता त्यात पुन्हा तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. भत्तावाढीमुळे 6 लाख सरकारी कर्मचारी, 4.5 लाख पेन्शनधारक आणि विविध निगम-महामंडळांमध्ये सेवा बजावत असलेल्या 3 लाख कर्मचाऱयांना अनुकूल होणार आहे.