आटपाडीत अतिवृष्टी नुकसानीची पाहणी
आटपाडी / प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे शेती, शेतकरी नष्ट झाला आहे. त्यांना तातडीची मदत केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे राज्य सरकार वेळकाढू पणा करत आहेत. आम्ही झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी बांधावर फिरत असून संवेदनाहीन सरकार दिखाऊपणा करत आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.
आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, जि. प. अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष पप्पू डोंगरे, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, हर्षवर्धन देशमुख, जि प सदस्य अरुण बालटे, तानाजी यमगर जयवंत सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर ही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडले. पायाखाली कार्पेट अंथरून मुख्यमंत्री पाहणी करत असून यांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय समजणार? असा सवालही त्यांनी केला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिवृष्टीमुळे आटपाडी तालुक्यातील झालेल्या नुकसानी ची माहिती दिली. उद्धवस्त झालेल्या डाळींब बागा, वाहून गेलेल्या जमिनी, पूल यांची पाहणी करून विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.