वाहने तपासून करणार दंडात्मक कारवाई : बुधवारी ठरलेल्या वेळेत पोलीस यंत्रणा उतरली रस्त्यावर
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने मंगळवार दि. 28 डिसेंबरपासून दहा दिवस नाईट कर्फ्यू लागू केला आहे. बेळगावात पहिल्या दिवशी दोन तास आधीच पोलीस रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे व्यापारी, नागरिकांनी पोलीस दलावर टीका केली होती. म्हणून दुसऱया दिवशी बुधवारी मात्र ठरलेल्या वेळेत पोलीस यंत्रणा रस्त्यावर आली.
कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱया लाटेच्यावेळी झालेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. आता कुठे व्यापार, व्यवसाय पूर्ववत सुरू होत असतानाच ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी सरकारने नाईट कर्फ्यू जारी केला आहे. रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यूची वेळ असली तरी ठराविक वेळेआधीच दुकाने बंद पाडण्यास पोलीस भाग पाडत आहेत, असा आरोप होत आहे. मंगळवारी झालेल्या आरोपामुळे बुधवारी पोलीस यंत्रणा जरा उशिरा रस्त्यावर उतरली. रात्री 10 नंतर पूर्णपणे संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक फिरू नये, असे आवाहन पोलीस दलाने केले असून बुधवारी रात्री उशिरा ठिकठिकाणी वाहने अडवून तपासणी करण्यात येत होती. कोणत्या कारणासाठी उशिरापर्यंत बाहेर फिरत आहात, याची विचारणा पोलीस करताना दिसत होते.
यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता नाईट कर्फ्यूसंबंधी जनजागृती झाली आहे. रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. त्यामुळे अनावश्यकपणे नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये. त्यामुळेच वाहनांची तपासणी हाती घेण्यात आली असून अनावश्यक फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.