प्रतिनिधी/बेळगाव :
रामनाथ मंगल कार्यालयाजवळ गेल्या चार दिवसांपासून पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे. मात्र पाण्याचा अपव्यय होत असून पाणीपुरवठा मंडळाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे उन्हाळय़ाच्या झळा जाणवल्या नाहीत. त्यामुळे पाणी टंचाईचेही संकट इतके गडद नव्हते. परंतु नेहमीच पाईपलाईन फुटून पाणी वाया जाण्याच्या प्रकारात मात्र वाढ झाल्याने पाणी असूनही नागरिकांना मात्र पाणी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
आठवडय़ाला कोठे ना कोठे तरी पाईपलाईन फुटून पाणी वाया जातच असते. रस्त्याच्या कामामुळे जेसीबी लावताना पाईपलाईन फुटल्याचे पाणीपुरवठा मंडळ सांगते. परंतु जेथे जेसीबीमुळे पाईप न फुटतासुद्धा जलवाहिनीला गळती लागते तेथेही पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्षच होते. नागरिकांनी याबाबत मंडळाला कळवून देखील मंडळ तातडीने दखल घेत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. पावसाचे अजूनही आगमन झाले नाही. त्यामुळे सध्या पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. अशावेळी जलवाहिन्यांना गळती लागून वाया जात असलेल्या पाण्याचा अपव्यय मंडळाने थांबवावा व त्यासाठी त्वरित दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.