ऑनलाईन टीम / मुंबई :
अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टवर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. आता या घोटाळ्याबाबत राजकीय नेत्यांनी देखील टीका करायला सुरुवात केली आहे. त्यातच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. ट्रस्टची स्थापना करताना सगळ्या भाजपच्या सदस्यांना घेण्यात आले आहे. आमच्या पक्षाचा एकही सदस्य नाही. यामुळे जर घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करावी आणि ट्रस्टकडून खुलासा करण्यात यावा असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राम मंदिराच्या निर्माणासाठी जगभरातून निधी आला. हा निधी लोकांनी श्रद्धेपोटी दिली आहे. अनेक ठिकाणाहून देणग्या गोळा केल्या गेल्या. राम मंदिर हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे घोटाळ्याचा विषय नाही. त्यामुळे जर निधीचा गैरवापर होत असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी खुलासा करावा अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे राऊत म्हणाले, प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा झाला नाही पाहिजे. पण जे जमिनीचे प्रकरण समोर आले आहे त्यामुळे आमच्या श्रद्धेला ठेच लागली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या पैशांचा गैरवापर होत असेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही. त्यामुळे या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि भाजपच्या नेत्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे.