वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना व्हायरस महामारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा हालचाली ठप्प झाल्या असून त्याला भारतातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा अपवाद नाही. 2020-21 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाचा निश्चित आराखडा अद्याप तयार करण्यात आलेला नाही. तथापि या हंगामातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक बनविणे खूपच लवचिक असल्याचे प्रतिपादन बीसीसीआयचे स्पर्धा विभागाचे प्रमुख साबा करीम यांनी केले आहे.
कोव्हिड-19 महामारीमुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत बळींची संख्या किमान 20 हजार झाली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने यापूर्वीच आपल्या सर्व क्रिकेट स्पर्धा जुलै महिनाअखेरीस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इंग्लंडमधील राष्ट्रीय क्रिकेट हंगामाचाही समावेश आहे. 2020-21 च्या क्रिकेट हंगामातील राष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक सध्या निश्चित करणे खूपच अवघड आहे. ऑगस्टपर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच या संदर्भात निश्चत निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयच्या क्रिकेट आयोजन विभागाचे सर व्यवस्थापक साबा करीम यांनी सांगितले. 2019-20 च्या क्रिकेट हंगामाला दुलीप करंडक स्पर्धेने ऑगस्टमध्ये प्रारंभ झाला असून गेल्या महिन्यात रणजी स्पर्धेने या हंगामाचा शेवट झाला आहे. रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामना झाल्यानंतर चार दिवसांच्या अंतराने इराणी करंडक सामन्याने याच हंगामाचा शेवट केला जातो. कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यात सुरू होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या क्रिकेट हंगामात बीसीसीआयतर्फे पुरूष आणि महिलांच्या विविध वयोगटात एकूण 2035 क्रिकेट सामने भरविण्यात आले होते. यापैकी वरिष्ठ पुरूषांच्या विभागात 470 सामने खेळविले गेले होते.