विधानसभेच्या सर्व जागा लढविणार, पक्ष क्रांती करणार असल्याचा दावा
प्रतिनिधी / पणजी
रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली असून हा पक्ष क्रांती करणार असल्याचा दावा आरजीचे निमंत्रक मनोज परब यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 40 जागा वाढवण्यात येणार असून लवकरच दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाकडे या नवीन पक्षाची नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोव्याच्या राजकीय क्षेत्रात या नवीन पक्षाची भर पडली असून गोवा राज्याचे भवितव्य गोमंतकीय जनतेनेच ठरवावे. प्रत्येक गोमंतकीयाने आरजीच्या या नवीन पक्षात सामील होऊन त्यात सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन परब यांनी केले. गोव्यात सर्वत्र भ्रष्टाचार चालू असून कचरा, खड्डे यांनी गोमंतकीय जनता त्रस्त झाली आहे. मामलेदारांकडे अनेक हेलपाटे मारून देखील कामे होत नाहीत. आता जनतेनेच क्रांती केली पाहिजे. गोव्याच्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकण्यात येत असून नोकऱयाही बाहेरील लोकांना देतात. या विरुद्ध हा पक्ष आवाज उठवणार असून सर्व गोमंतकीय जनतेला संघटित करणार आहे. पर्यटक कमी होत असून किरकोळ अंमलीपदार्थ विक्रेत्यांना पकडले जाते, माफियांना कोण हात लावत नाहीत. मंत्री तर काहीच उपयोगाचे नाहीत. हा पक्ष कोणाकडे युती करणार नाही. पालिका निवडणूक लढवणार नाही तर थेट विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे, असे ते म्हणाले.