पॉझिटिव्हिटी दरही 21.36 वरून 14 टक्क्यांवर : दर दिवशी पाच हजार टेस्ट – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाला रेडझोनमधून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून प्रामुख्याने कोरोना टेस्टिंगचे प्रमाण दररोज पाच हजारापर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा पॉझिटीव्हीटी दर 21.36 वरून 14 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. राज्यातील रेडझोन जिल्हय़ांच्या यादीतील पहिल्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्हा आला आहे. जनतेने असेच सहकार्य केल्यास पुढील आठवडाभरात जिल्हय़ात कोरोना नियंत्रणात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी व्यक्त केला.
जिल्हा रेडझोनमधून बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोना बाधित रुग्णांना चांगली आरोग्य सेवा आणि लोकांचे जीव वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. कोविड सेंटर सुरू करून त्याठिकाणी ऑक्सिजनबेड उपलब्ध करणे, डॉक्टर देणे याबाबतची कार्यवाही सुरूच आहे. त्याचबरोबर कोरोना रोखण्यासाठी हरतऱहेचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोना टेस्टिंग वाढविण्यात आल्या आहेत.
जिल्हय़ात आरटीपीसीआर व ऍन्टीजनच्या एक ते दोन हजार कोरोना टेस्टिंग होत्या. त्या आता दररोज पाच हजारापर्यंत केल्या गेल्या आहेत. सोमवारी 3 हजार 389, मंगळवारी 5 हजार 300 आणि बुधवारी 5 हजार 507 एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर टेस्टिंग करण्यात आल्या आहेत.
जिल्हय़ातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय विनाकारण फिरणारे सर्व लोक, हॉटेल चालक, रिक्षाचालक, दुकानदार, व्यावसायिक, वाहन चालक या सर्वांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले गेले आहेत.
कोरोना टेस्टिंग वाढविल्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा लवकर शोध घेणे शक्मय होऊन कोरोनाचा फैलाव रोखणेही शक्मय होत आहे. वेळीच टेस्टिंग केल्यामुळे वेळेत उपचार करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
कोरोना चाचण्या दरदिवशी पाच हजारापर्यंत वाढवून 24 तासात तीनवेळा आरटीपीसीआर लॅबमध्ये रिपोर्ट काढण्यात येत आहेत. त्याशिवाय अँटीजन टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. याचा चांगला परिणाम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा पॉझिटिव्हिटी दर 21.36 वरून 14 पर्यंत खाली आला आहे. तसेच राज्यातील रेडझोनमधील जिल्हय़ांच्या यादीत पहिला क्रमांकावर असणारा जिल्हा सातव्या क्रमांकावर आला आहे.
तसेच कोरोना टेस्टिंग वाढविणे तसेच ग्रामस्तरावर विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी सर्व सरपंचांना आवाहन केले असून जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर याकडे जातीने लक्ष घालत आहेत, अशीही माहिती देण्यात आली. गावचे सरपंच आणि ग्राम कमिटीचे योगदान फार महत्वाचे आहे. त्यांनी सहकार्य केल्यास निश्चितच कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येणार आहे.
‘त्या’ 19 डॉक्टरबाबत तसे आदेश नाहीत!
प्राथमिक आरोग्य केंद्रातील 19 डॉक्टरना काढून जिल्हा रुग्णालयात सेवा देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत, या भाजपच्या आरोपाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराना जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी आदेश काढलेले नाहीत. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या ठिकाणी एमबीबीएस व बीएचएमएस दोन डॉक्टर आहेत, त्यातील एमबीबीएस डॉक्टरनी जवळच्या कोविड सेंटरमध्ये अधूनमधून सेवा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या.