अनेक खंदे समर्थक काँग्रेसमध्ये दाखल
प्रतिनिधी /पणजी
पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी आपल्या खंदय़ा समर्थकांच्या माध्यमातून मंगळवारी काँग्रेसच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवले. पंचसदस्य, जिल्हा पंचायत सदस्य आणि अन्य अनेक प्रमुख समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले असून आमदारकीचा कार्यकाळ संपेपर्यंत खंवटे काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीस अद्याप अडीच महिने बाकी असले तरीही आतापासूनच राजकीय घडामोडी वेग घेऊ लागल्या आहेत. त्यात नव्या कार्यकर्त्यांचे राजकीय पक्षात दाखल होणे व जुन्यांचे जाणे-येणे असे प्रकार वाढू लागले आहेत. मंगळवारी काँग्रेस हाऊसमध्ये आयोजित सोहळ्यात पर्वरीतील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना चोडणकर यांनी, भाजपविरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी अनेक पक्ष गोव्यात दाखल होत असून त्यामागे भाजपचाच हात आहे. त्यामुळेच लोक काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत. पर्वरीत काँग्रेस आता अधिक मजबूत झाली आहे. भाजपात मिळणाऱया अपमानास्पद वागणुकीला कंटाळून त्यांचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले.
भाजप सध्या महोत्सवी मूडमध्ये
दिगंबर कामत यांनी बोलताना, भाजपच्या महिला संसद कार्यक्रमावर जोरदार टीका केली. या सरकारने लोकांना वाऱयावर सोडले असून जनतेच्या सुखदुःखाशी कोणतेही सोयरसूतक राहिलेले नाही. सरकार सध्या महोत्सवी मूडमध्ये असून करदात्यांच्या कष्टांच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करून कार्यक्रम, सोहळे, संसदा भरविल्या जात आहेत. या सोहळ्यांसाठी कदंब महामंडळासही दावणीला बांधले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे बसेसविना अतोनात हाल झाल्याचे त्यांनी सांगितले. पणजी मडगाव रस्त्याची दैनावस्था झाली आहे. खड्डे आजही अस्तित्वात आहेत, मात्र सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱयांमद्ये पेन्ह द फ्रान्सचे माजी जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नाईक, सुकुरचे पंचसदस्य सुभाष हळर्णकर, पेन्ह द फ्रान्सचे पंचसदस्य श्यामसुंदर कामत, पर्वरी महिला महासंघाच्या अध्यक्ष मरीना मोराईश, नारायण नाईक, बोनी पिंटो, नीलेश नाईक, किशोर सावंत, सिद्धेश नाईक, वेरोनिका डिसिल्वा, यांचा समावेश होता.
सत्तापालट हाच उपाय : गुपेश नाईक
भाजपला सध्या लोक प्रचंड कंटाळले असून येत्या निवडणुकीत निश्चितच धडा शिकविणार आहेत. महागाईने तर लोकांचे कंबरडेच मोडले असून यावर सत्तापालट हाच एकमेव उपाय आहे आणि लोकांनी तसा निर्धार करावा, असे आवाहन गुपेश नाईक यांनी केले.
आश्वासने पदरात पाडण्यासाठी करावी लागतात आंदोलने : मरिना
भाजपमध्ये लोकांना केवळ आश्वासने मिळतात आणि त्या आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी लोकांना आंदोलने करावी लागतात. सरकारच्या गैरकारभाराला लोक कंटाळले आहेत. महिला बालकल्याण खात्याच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी महिलांना उंबरठे झिजवावे लागतात, असा आरोप मरिना मोराईश यांनी केला.
दोनशे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले हा दावा खोटा : गिरीश
भाजपने कितीही दावे केले तरी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून 200 च्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेले नाही. ‘दोन गेले आणि दोनशे दाखवले’, असा हा प्रकार असून भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाचा कळस आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
पणजीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही तर भाजपच्या खोटारडेपणाची परिसीमा असल्याचे सांगितले. गत आठवडय़ात मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघातील 200 काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्याचे वृत्त पसरले होते. त्यासंबंधी विचारले असता चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी तेवढी नावे दाखवावी व दावा सिद्ध करावा, असे आव्हान दिले. सध्या अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत असंतोष खदखदत आहे. त्यामुळे कित्येकजण काँग्रेसच्या संपर्कात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा संख्येने भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत, असेही चोडणकर म्हणाले. भाजपने आतापर्यंत आडमार्गाने सत्ता मिळविली आहे. काँग्रेसचे आमदार चोरून मुख्यमंत्री सत्ता उपभोगत आहेत. मात्र येत्या निवडणुकीत मतदार त्या आमदारांना आणि मुख्यमंत्र्यांनाही धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसवर आजही लोकांचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.