गेल्या वषी लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळित किंवा ठप्पच झाले होते. पण त्या काळात एक करमणूक होती. रोज दिवसातून चारपाच वेळा अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारशी बोलणे व्हायचे. कोणालाही फोन लावला तरी आधी अमिताभ आपल्याशी चार शब्द बोलायचा. नंतर त्याची जागा कोणा तितक्मयाच धीरगंभीर ताईंनी घेतली. त्यांचा एक डायलॉग ह्रदयद्रावक होता, लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही. तुम्ही आम्ही रोग्याशी लढतो-भांडतो असा अमिताभचा किंवा त्या ताईंचा गैरसमज का झाला हे कळायला मार्ग नाही.
तर तो लॉकडाऊन एकदाचा संपला. कोरोना गेल्यासारखे वाटले. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी परवाच सांगितले की कोरोनाचा व्हायरस म्हणतोय, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.’ येतोस तर ये बाबा. आम्ही काय, तोंडाला मास्क लावून फिरू. कोणाशीही हस्तांदोलन टाळू. घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवू. पण आता अमिताभला फोनवर काही वेगळय़ा गप्पा मारायला सांगा बुवा.
मध्यंतरी सेलिब्रिटी लोकांच्या ट्विटवरून बरेच वाद झाले होते. पूर्वी म्हणजे पेट्रोलचे भाव वाढल्यावर अमिताभ वगैरे लोक ट्विट करायचे की थोडेसे पेट्रोल द्या, गाडीवर शिंपडतो आणि गाडी पेटवून देतो. आता ते असे ट्विट करीत नाहीत म्हणून लोक रागावले आहेत.
आमच्या मते ट्विटऐवजी या सेलिब्रिटी लोकांनी फोनवर गप्पा माराव्यात. गप्पांसाठी खालील संहिता सुचवतो आहे. पसंत पडल्यास मायबाप सरकारने (भरघोस) मानधन पाठवून द्यावे, ही विनंती.
तुरीच्या डाळीचे, खाद्यतेलांचे आणि स्वयंपाकाच्या गॅसचे भाव वाढले म्हणून चिंता करू नका. आठवडय़ातून एक दिवस इष्ट देवतेच्या वारी पूर्ण लंघन केले तर पदरी पुण्य पडेल आणि मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होईल. खर्चात बचत होईल. ज्यांना मधुमेह असेल त्यांची शुगर निदान चोवीस तास तरी गोळीशिवाय कमी राहील आणि गोळीचा खर्च वाचेल. लक्षात ठेवा, आपल्याला महागाईशी लढायचे आहे, दुकानदाराशी नाही.
पेट्रोलचे भाव वाढले म्हणून त्रागा करू नका. आठवडय़ातून सहा दिवस आपण सगळी कामे करण्यासाठी पायी गेलो तर पेट्रोलचे पैसे वाचतील. शिवाय व्यायाम होऊन आपले शरीर निरोगी होईल. लक्षात ठेवा, आपल्याला पेट्रोलच्या भाववाढीशी लढायचे आहे, पेट्रोल पंपवाल्याशी किंवा सरकारशी नाही.