प्रतिनिधी / राजापूर
राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत भिकाजी एकल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला नियोजित विवाह अवघ्या 10 नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पाडला. शिवाय विवाहाच्या खर्चात बचल झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीला देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुशांत एकल आणि पेशाने फार्मासिस्ट असलेल्या श्रेया श्रीकांत पाटील यांचा विवाह दि.16 एप्रिल 2020 रोजी पनोरी, तालुका राधानगरी येथे मूळ गावी होणार होता. सद्यस्थितीत फैलावलेल्या कोरोना महामारीमुळे लॅाकडाऊन असल्याने लग्न तसेच अन्य सार्वजनिक कार्यकम म्हणजे ज्या ठिकाणी गर्दी होईल अशा कार्यकमांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी अनेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत.
परंतु लॉकडाऊनच्या परिस्थितीत शासनाच्या निर्देशांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेऊन नियोजित तारखेलाच हा विवाह घरातच करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबियांनी घेतला. त्यानुसार दोन्हीकडील 5-5 नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. तर इतर नातेवाईक व मित्र परिवार यांनी या नवपरिणीत वधुवरांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. दरम्यान लॉकडाऊनमुळे साध्या पध्दतीने विवाह पार पडल्याने विवाहासाठी होणारा खर्च टळला. त्यामुळे बचत झालेली रक्कम कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ केली आहे.
सुशांत व श्रेया हे नव वर व वधू म्हणाले की, कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे डामडौल न करता आपल्या घरात विवाहबद्ध होऊ शकतो. लॉकडाऊन आहे म्हणून नव्हे, तर खर्च टाळून कायम असे प्रयोग करता येऊ शकतात आणि ते सर्वांनी करावेत. विवाहाला होणाऱया खर्चातून गरजू, कष्टकरी कामगारांना अन्नधान्य आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार असल्याचे नवदांम्पत्याने सांगितले.