चीनकडून दावा – दोन्ही देशांचे सैनिक मागे घेण्यास प्रारंभ
वृत्तसंस्था / बीजिंग
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबत 9 महिन्यांपासून सुरू असलेला तणाव संपुष्टात आल्याचा दावा चीनच्या प्रशासनाने बुधवारी केला. बुधवारपासून दोन्ही देशांकडून सैनिक मागे घेण्यास प्रारंभ करण्यात आल्याचे चीनने म्हटले आहे. पण भारताकडून याप्रकरणी कुठलेच वक्तव्य करण्यात आलेले नाही. पँगॉग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर भागातून भारत-चीनच्या सैन्याने माघारीची प्रक्रिया सुरू केल्याचा दावा चिनी प्रसारमाध्यमाने केला आहे.
चीन आणि भारतादरम्यान सैन्य कमांडरस्तरीय चर्चेच्या 9 व्या फेरीतील चर्चेत माघारीवर सहमती झाली होती. याअंतर्गत दोन्ही देशांच्या सैन्यांनी पँगॉग हुनान आणि उत्तर काठावरून मागे हटण्यास सुरुवात केल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू कियान यांनी म्हटले आहे. चर्चेची नववी फेरी पूर्व लडाखच्या मोल्दोमध्ये 15 तास चालली होती. वादग्रस्त भागातून सैनिक हटविणे आणि तणाव कमी करण्याची प्रक्रिया पुढे नेण्याची जबाबदारी आता चीनवर असल्याचे भारताने स्पष्ट केले होते.
एप्रिलपासून सैन्य तणाव
चीन आणि भारताचे सैन्य पूर्व लडाखमध्ये मागील वर्षी एप्रिल-मेपासून परस्परांसमोर उभे ठाकले आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱयात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. चीनचेही 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते, पण त्याने याची जाहीर कबुली दिली नव्हती. दोन्ही देशांच्या विदेशमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी हा तणाव दूर करण्यासाठी चर्चा केली आहे. दोन्ही देशांनी लडाखच्या काही भागांमधून सैन्य हटविण्यावर सहमती दर्शविली होती.
काय होणार?
चर्चेतील सहमतीनुसार फिंग 4 मध्ये दोन्ही देशांकडून गस्त घातली जाणार नाही. फिंगर 4 ला गस्तरहित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय टप्पाबद्ध पद्धतीने अंमलात आणला जाणार आहे. तर चिनी सैन्य फिंगर 8 कडून तर भारतीय सैन्य धनसिंग थापा पोस्टकडून (फिंगर 2 ते फिंगर 3) कडून परतत असल्याचे समजते, पण या माहितीला पुष्टी मिळू शकलेली नाही.