भारताकडून औषधे तर पाककडून दहशतवादाची निर्यात
वृत्तसंस्था/ श्रीनगर
भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शुक्रवारी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर कठोर शाब्दिक हल्लाबोल केला. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना पाकिस्तान मात्र दहशतवादाची निर्यात करण्यातच गुंग असल्याचे ते म्हणाले. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घुसखोरी, चकमकी आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा ‘वॉर’ केला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आम्ही देशवासियांचे संरक्षण करण्यात व्यग्र आहोत. त्याचबरोबर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत भारत मदतीचा हात देत आहे. पण पाकिस्तान मात्र दहशतवाद निर्यात करण्याकडेच अधिक लक्ष देत असल्याचे लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. ते सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. या दौऱयावेळी त्यांनी शुक्रवारी सीमारेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. सीमारेषेवर गेल्या काही दिवसात अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. याबाबत भाष्य करताना, संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत असताना पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याची बाब दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानकडून केरन सेक्टरमध्ये वारंवार होणारा घुसखोरीचा प्रयत्न आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन याला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर दिलेले आहे. नुकतेच भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दुधिनयाल परिसरातील दहशतवादी लाँचपॅडवर हल्ला करत पाकिस्तानला अद्दल घडविली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लष्करातील आठ जणांना कोरोना
आतापर्यंत भारतीय लष्करातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील दोन डॉक्टर आणि एक नर्सिंग असिस्टंट आहे. इतर चार रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच एक जण लडाखमधील जवान असून तो पूर्ण बरा झाला असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले.