खादरवाडी क्रॉसजवळ पहाटेपासूनच नागरिकांची भली मोठी रांग.
प्रतिनिधी /बेळगाव
लस घेतली नाही म्हणून कंपनी कामावर घेत नाही. काम नाही म्हणून दाम नाही. दाम नाही म्हणून घरी चूल पेटत नाही, अशा विचित्र कोंडीत सध्या नागरिक सापडले आहेत. लस पुरविण्याबाबत प्रशासनाचे नियोजन पूर्णतः ढासळले आहे. परिणामी लसीसाठी रांगांच्या रांगा लागत असून लोकांची निष्कारण फरफट होत आहे.
सोमवारी सकाळी खानापूर रोड, खादरवाडी क्रॉसजवळ लक्ष्मी मंदिरनजीक सकाळी 6 पासूनच लससाठी नागरिकांची भली मोठी रांग लागली होती. परंतु लस उपलब्ध झाली नाही. पहाटेपासून आलेल्या महिलांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी प्रशासनाच्या नावाने शिमगा सुरू केला.
आम्ही खासगी कंपन्यांमध्ये विविध स्वरुपाची कामे करतो. परंतु लस घेतल्याचे प्रमाणपत्र असेल तरच कामावर घेऊ, असे कंपनीचालक सांगत आहेत. यामुळे लस मिळत नाही तोवर कंपनीत जाता येत नाही. कामावर गेल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही जायचे कोठे आणि कोणाला जाब विचारायचा? असा प्रश्न येथील नागरिकांनी केला.
मुला-बाळांना काय खायला घालू!
सलग चार-पाच दिवस आम्ही येथे येत आहोत. परंतु आज नाही उद्या या, असे म्हणत येथील अधिकारी आम्हाला परत पाठवत आहेत. कंपनी लस घेतली नाही म्हणून परत पाठवत आहे. आम्ही उपाशी राहू, पण मुला-बाळांना काय खायला घालू, असा प्रश्न शकुंतला या महिलेने केला. रेशनकार्डावर पुरेसे रेशनही आता मिळत नाही. गहू आणि तांदूळ व्यतिरिक्त काहीच दिले जात नाही. अशा परिस्थितीत उदरनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्नही रांगेतील नागरिकांनी केला.