पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाल्याने अनेक राज्यांनी नियम कठोर केले आहेत. की राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र या निर्बंधांच्या काळातही लसीकरणाचा वेग मंदावला जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सध्या लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. लॉकडाऊनमुळे लस घेण्यासाठी लोक बाहेर पडू शकणार नाहीत. तशी स्थिती राज्यांनी टाळावी. लसीकरणाला कठोर नियमांमधून सूट द्यावी, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
सध्या 12 राज्यांमध्ये उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक किमान 1 लाखांहून अधिक आहे. काही जिल्हय़ांमध्ये स्थिती अतिशय बिकट आहे. या स्थितीचा आढावा पंतप्रधान मोदींकडून गुरुवारी एका बैठकीत घेण्यात आला.
काही राज्यांजवळ लसी मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंधांच्या स्थितीमुळे लसीकरण थंडावले आहे. शिवाय असलेल्या लसी वाया जाण्याचा धोका आहे. हे टाळण्यासाठी लसीकरण जितक्या प्रमाणात शक्य आहे, तितक्या प्रमाणात केले जावे. जेवढय़ा लसी राज्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्या तरी दिल्या जाव्यात. सरकारने लसींचे उत्पादन वाढावे यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे उत्पादन पुरेशा प्रमाणात होणार आहे. सध्या लसी वाया न घालविता त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.