उन्हाळय़ाचे जुने दिवस आठवतात. शाळांना-कॉलेजेसना सुट्टय़ा लागलेल्या असत. सकाळी ऊन कोवळे असताना आम्ही खेळायला-फिरायला बाहेर पडलो की ऊन प्रखर व्हायच्या आत घरी परतायचो. जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरच्या मुख्य दुकानात, अल्पना चित्रपटगृहाजवळच्या झाडाखालच्या दुकानात थंडगार आणि किंचित गोड नीरा मिळायची. नीरा पिताना समोरच्या पाटीवर लिहिलेले नीरेचे आरोग्यविषयक फायदे वाचले की त्या ग्लासभर नीरेने आपण आरोग्यसंपन्न झाल्याचा भास व्हायचा. काही वेळा आम्हाला दुकानात जायला वेळ झाला की तिथे पाटी असायची नीरा संपली.
वर्षे जात राहिली. केव्हातरी हिंदुस्तान, संतोष वगैरे बेकऱयांनी पॅटीस नावाचा पदार्थ आणला. रविवारी स्कूटरवर जाऊन तिथे रांग लावायची, ते किंचित तेलकट, पण खुसखुशीत पॅटीस घरी आणून न्याहारी करण्याची फॅशन आली होती. तिथे देखील उशीर झाला की ‘पॅटीस संपले’ ही पाटी बघावी लागे. या सगळय़ा काळात आम्ही आमच्या मुलांनी आणि नातवंडांनी वेगवेगळय़ा लशी टोचून घेतल्या. शाळेत असताना देवीची अतिशय दुखणारी लस टोचली जाई. ती चुकवण्यासाठी आम्ही लाखो प्रयत्न केले असतील. पण ‘लस संपली’ ही गोड पाटी बघण्याचे भाग्य आमच्या कपाळी नव्हते. लस संपणे हे प्रकरण एकविसाव्या शतकातच अवतरले. परममित्र नागजंपी ऊर्फ नाग्याशी या संदर्भात आमचा संवाद झाला. “महाराष्ट्राचं सरकार म्हणतंय की केंद्राकडून पुरेसं लस मिळालं नाही. केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही भरपूर लस दिलं. कोण खोटं बोलतंय काही समजत नाही रे.’’“आणि समजलं तर तू त्यांचं काय वाकडं करणार आहेस? फेसबुक किंवा ट्विटर किंवा व्हॉट्सअपवर त्यांना शिव्या घालणार ना? त्यांना काही फरक पडत नाही.’’
“पण आपल्याला शिव्या दिल्याचं आनंद मिळतं ना. सांग, मी कोणाला शिव्या देऊ?’’“लहानपणी आपण अल्लादिन आणि जादूच्या दिव्याची गोष्ट वाचलेली तुला आठवते का? त्यात जादूची अंगठी आणि दिवा असतो. दिव्याचा राक्षस अंगठीच्या राक्षसापेक्षा मोठा असतो. त्यामुळे ज्याच्याकडे दिवा असेल तो अंगठीच्या मालकापेक्षा जास्त पॉवरफुल असतो. कोणाची बाजू बरोबर आणि कोणाची चूक याला महत्त्व नाही. तेच आजच्या राजकारणात. राज्यातली सत्ता म्हणजे अंगठी आणि केंद्रातली सत्ता म्हणजे दिवा हे लक्षात ठेव.’’ “लस संपलं त्याला कोण जबाबदार हे सांग ना.’’
“तूच ठरव.’’