भरत सातोस्कर / वेंगुर्ले:
स्वर्गीय आनंद लुटण्यास जात आहोत, असा आभास निर्माण करणारे वेंगुर्ले सागर बंगला ते लाईट हाऊसपर्यंत जाणाऱया पायऱयांच्या पायवाटेचे काम पूर्णत्वास आले आहे. हे काम पूर्णत्वास येऊनही त्याचे लोकार्पण रखडल्याने नागरिक व पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट दूर होत असतानाही या कामाचे लोकार्पण झाले नसल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.
जिल्हय़ाचे पालकमंत्री असताना दीपक केसरकर यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मुलभूत सुविधांकरिता अर्थसंकल्पीय तरतूद करून 91 लाख 20 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. सागर बंगला ते लाईट हाऊसकडे जाणाऱया पायऱयांच्या पायवाटेचे काम आता पूर्णत्वास आले आहे.
दरम्यान, अनेक वर्षांची मागणी असलेल्या या पर्यटनस्थळाच्या मार्गाचे पूर्णत्वास आलेले काम पाहून पर्यटक नक्कीच सुखावतील याची खात्री आहे. पर्यटनदृष्टय़ा झालेले काम हे सुदंर व मनमोहक आहे. सागर बंगला ते लाईट हाऊसपर्यंत जाणाऱया पायवाटेवर 188 पायऱया आहेत. या पायऱया जांभ्या दगडाचा वापर करून बांधण्यात आल्या आहेत. त्या ‘अपेक्स आऊटडोअर फ्लोअर कोटिंग’ने (केशरी रंगाने) तयार केलेल्या असून त्यावर शेवाळ येणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. या मार्गावरून जाताना पायवाटेच्या दुतर्फा ‘हेवी जीआय रेलींग पाईप’चा वापर करून कठडा निर्माण केला आहे. चढाव चढताना रेलिंगला पकडून सहज जाता येईल, अशी व्यवस्था केली आहे.
या मार्गावर प्रत्येक आठ फुटाच्या अंतरावर विद्युत दिवे लावले गेले आहेत. 188 पायऱयांवर एकूण 163 विद्युत दिवे लावण्यात आले आहेत. या मार्गात दोन ठिकाणी विश्रांतीसाठी सोफेही बांधण्यात आले आहेत. वेंगुर्ले बंदर येथून लाईट हाऊसकडे जाण्यासाठी एकूण 248 पायऱया असून पहिल्या 60 पायऱयांवर पूर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याने लाईट व्यवस्था व वेगळ्य़ा फरशा बसवून पर्यटन स्थळाकडे जाणाऱया भागाचा विकास केला आहे. आमदार केसरकर यांनी पर्यटन विकासदृष्टय़ा निधी उपलब्ध करून दिलेल्या या विकासकामाचे लवकरच लोकार्पण व्हावे, अशी नागरिक व पर्यटकांतून मागणी होत आहे.