वर्षभरापासून काम ठप्प, लाभार्थी रेशनपासून वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून अंत्योदय, एपीएल आणि बीपीएल रेशनकार्डांची पूर्तता केली जाते. मात्र मागील वर्षभरापासून नवीन रेशनकार्डचे काम ठप्प झाल्याने सर्वसामान्यांसह अनेक गोर-गरीब जनतेला रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे साधारण मार्च महिन्यापासून नवीन रेशनकार्डचे काम थांबले आहे. केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करून घेतले जात असले तरी अद्याप लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्डे मिळाली नाहीत.
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना अतिरिक्त धान्यांचा पुरवठा केला जात आहे. मात्र बऱयाच लाभार्थ्यांकडे रेशनकार्डे नसल्याने रेशनपासून वंचित रहावे लागत आहे. गोर-गरीब जनतेला वेळेत धान्य मिळावे, याकरिता शासनाकडून बीपीएल कार्डांची पूर्तता केली जाते. मात्र नवीन बीपीएल कार्डांच्या कामालादेखील स्थगिती मिळाल्याने सर्वसामान्य जनतेला मोफत रेशनपासून दूर रहावे लागत आहे.
रेशनकार्ड प्रक्रिया ही बायोमेट्रिक (अंगठय़ांचे ठसे) द्वारा चालते. त्यामुळे कोरोना काळात खबरदारी म्हणून ही प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून नवीन रेशनकार्डच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड बंधनकारक आहे. मात्र अनेकांकडे रेशनकार्डेच नसल्याने शासकीय कामांमध्येदेखील अडचणी येत आहेत. कोरोना काळात जनता अडचणीत आली होती. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारकडून या काळात अतिरिक्त धान्यांचा पुरवठा करण्यात आला. मात्र अनेक लाभार्थ्यांकडे बीपीएल कार्डेच नसल्याने नियमित धान्यांबरोबर अतिरिक्त रेशनपासूनदेखील वंचित रहावे लागले.
अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना केंद्रसरकारकडून 5 किलो आणि राज्य सरकारकडून 5 किलो असे एकूण 10 किलो धान्य माणसी वितरित केले जात आहे. हा अतिरिक्त रेशन पुरवठा नोव्हेंबरपर्यंत केला जाणार आहे. मात्र काही लाभार्थ्यांकडे बीपीएल कार्डेच नसल्याने नियमित धान्यांबरोबर नोव्हेंबरपर्यंत वितरित केल्या जाणाऱया अतिरिक्त धान्यांपासून वंचित रहावे लागणार आहे.
निवडणुकीमुळे नवीन रेशनकार्ड काम लांबणीवर
ग्रा. पं. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामुळे नवीन अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डचे काम लांबणीवर पडले होते. मात्र आता निवडणुका संपल्या तरी नवीन रेशनकार्ड कामाला अद्याप प्रारंभ झाला नाही. त्यामुळे गोर-गरीब जनतेला फटका बसला आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्डच्या वितरणाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.