क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या लीगमध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी आज मुंबई व एटीके संघ जीएमसी स्टेडियमवर आमनेसामने येतील. सध्या एटीके मोहन बागानचे 19 सामन्यांतून 40 तर मुंबई सिटी एफसीचे 37 गुण आहेत. एटीकेने सामना जिंकला तर ते शील्ड विजेते होतील. मुंबई जिंकली तर गोलसरासरीवर ते विजेते असतील.
या दोन्ही संघांचे बाद फेरीतील स्थान नक्की झाले असले तरी लीगमधील अव्वल स्थानाच्या शील्डसाठी त्यांच्यात चुरस असेल. अखेरच्या साखळी लढतीला याहून जास्त महत्व मिळणे शक्य नव्हते. लीगमध्ये सर्वाधिक सातत्य राखलेल्या संघांमध्ये रंगतदार मुकाबला होईल. संपूर्ण मोसमात आघाडीवर या दोनपैकी एक संघ होता. मोसमाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई सिटीने आरामात आघाडी राखली, पण जानेवारीपासून त्यांच्या कामगिरीत अनपेक्षित घसरण झाली. त्यामुळे प्रतिस्पर्धी एटीके मोहन बागानने त्यांना मागे टाकून पहिले स्थान मिळविले.
आता एकच सामना बाकी असताना मुंबई सिटीसाठी विजय अनिवार्य आहे. जिंकले तरच अव्वल स्थानासह एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील सहभागाचा मानही मिळेल. त्यांना तीन पेक्षा कमी गुण मिळाले तर हा मान एटीके मोहन बागानने पटकावलेला असेल. पहिल्या टप्प्यातील लढतीत मुंबई सिटीसाठी बार्थोलॉमियाँव ओगबेचेचा गोल निर्णायक ठरला होता, पण आज सर्जिओ लॉबेरा यांच्या मते हा सामना वेगळा असेल. पहिल्या टप्प्यातील सामना नेहमीसारखाच आणखी एक होता, जो जिंकल्याने आम्हाला तीन गुण मिळाले. हा सामना मात्र अंतिम सामनाच असेल. आम्हाला जिंकण्यासाठी खेळावे लागेल आणि आम्हाला परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळावी लागेल. आम्ही पूर्वी खेळलो तसा हा सामना नसेल, कारण केवळ तीन गुणांसाठी नव्हे तर जणू अंतिम सामना जिंकण्यासाठी ही लढत आहे, असे लॉबेरा म्हणाले. स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक संघ विरूद्ध सवोंत्तम बचावात्मक संघ अशी लढत रंगेल. मुंबई सिटीने 33 गोल केले असून संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्याची त्यांची टक्केवारी सर्वोत्तम आहे. दुसरीकडे एटीके मोहन बागानचा बचाव सर्वाधिक चिवट ठरला आहे. त्यांच्याविरुद्ध केवळ 13 गोल झाले आहेत, याशिवाय स्पर्धेत सर्वाधिक 10 क्लीन शीट त्यांनी राखल्या आहेत.