प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सदुपयोग करत नायशी-सावर्डे येथील संदीप घाग यांनी गावातील 15 गुंठय़ातील जागेत भाजीचा मळा फुलवला आहे. यामध्ये मिरची, भेंडी, टोमॅटो, वांगी गवार, दोडका, काकडी, भोपळा, कोथिंबीर, मुळा, दुधी भोपळा, कारले, वाल, तूर, आलं, झेंडू फुले, हळद, पालेभाजीची लागवड करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
युटय़ूबवरील शेतीविषयक चित्रफिती व चित्रवाहिनीवरील ‘सातबारा’ उपक्रम पाहून प्रेरित झालेल्या घाग यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत मिळालेला वेळ शेतीच्या माध्यमातून सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याच माध्यमातून अधिक माहिती गोळा करत 15 गुंठे जागेत लागवडीला प्रारंभ केला. पत्नी समीक्षा, मुलगा स्वर, आई वंदना यांची साथ मिळाल्याने बाहेरचे मनुष्यबळ वापरण्याची गरजच भासली नाही. यामुळे कुटुंबानेच शेतात राबवून फुलवलेले हे मळे मजुरांबाबतची अनेक कारणे पुढे करणाऱयांना आत्मनिर्भरतेचे धडे देत आहेत.
यामध्ये घाग यांनी मिरची व भेंडी रोपांना प्राधान्य दिले आहे. मिरचीची लागवड करताना काश्मिरी, बॅडगी, संकेश्वरी अशा तिन्ही प्रकाराची लागवड केली आहे. सावर्डे येथील सह्याद्री कृषी केंद्रातून घाग यांनी बियाणे खरेदी केले व एप्रिल महिन्यात बियाणांची पेरणी तयार केली. मुळा व भाजीपाल्याचे उत्पन्न आजपर्यंत घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही भाजीपाला लागवड पूर्णपणे रासायनिक खतविरहित असून केवळ शेणखताचा वापर करण्यात आला आहे. लागवडस्थळी मिरचीची रोपे विक्रीसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भाजीपाल्यासह भविष्याचा वेध घेत वेंगुर्ला काजूची रोपेही लावली आहेत. सहकार महर्षी स्व. गोविंदराव निकम यांनी खरवते येथील 5 गुंठे जागेत शेतघर उभारून स्वावलंबन केंद्राचा प्रयोग करीत ग्रामीण भागातील शेतकऱयांना स्वावलंबी करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. यातूनच प्रेरणा घेत हा उपक्रम राबवल्याचे संदीप घाग यांनी सांगितले.
केवळ साडेतीन हजाराचा खर्च
सुमारे 15 गुंठे जागेतील या लागवडीसाठी घाग यांना केवळ साडेतीन हजार रूपये खर्च आला आहे. यामध्ये बियाणांचा खर्च दीड हजार रूपये असून इतर खर्च दोन हजार रूपये आहे. मात्र यासाठी घाग कुटुंबिय दररोज 4-5 तास राबत असून त्यांच्या कष्टाचे आता चिज झाले आहे. यातून सुमारे 400 कुटुंबांना पुरेल इतका भाजीपाला उत्पादित होणार आहे.