सुशांत कुरंगी / बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात अनेक अफवांना ऊत आला होता. पोस्टामध्ये बँक खाते उघडल्यास नागरिकांच्या खात्यामध्ये 5 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी अफवा उठविण्यात आली होती. त्यामुळे पहाटेपासून रांगा लावून नागरिकांनी पोस्ट कार्यालयात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाती उघडली. यामुळे अफवेमुळे का होईना पण या लॉकडाऊनच्या या 3 महिन्याच्या काळात बेळगाव विभागात तब्बल 30 हजार नवी बँक खाती उघडण्यात आली आहेत.
कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहक बॅंकेकडे जातो. परंतु बँक व्यवहारांसाठी ग्राहकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची स्थापना झाली. शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयापासून ते ग्रामीण भागातील छोटय़ा पोस्ट कार्यालयापर्यंत सर्व कार्यालयांना या बँकेची सेवा केंदे तयार करण्यात आली आहेत. पूर्णपणे पेपरलेस व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ही बँक तयार करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात या बँकेमध्ये खाती उघडण्याचा सपाटा लावण्यात आला होता. पैसे जमा होणार असल्याच्या अफवेमुळे घरातील प्रत्येकाचे खाते उघडण्यात आले. पहाटेपासून बेळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयासमोर खाती उघडण्यासाठी गर्दी करीत होते. ग्रामीण भागातही खाते काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. शून्य रुपये बॅलन्स ठेवून खाते सुरू करण्यात येत असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी खाती काढली. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बेळगाव, रामदुर्ग, सौंदत्ती, खानापूर, कित्तूर, बैलहोंगल या 6 तालुक्मयांमध्ये तब्बल 30 हजार नवी बँक खाती काढण्यात आली.
11 कोटी रुपये पोहचविले ग्राहकांपर्यंत
कोणत्याही सरकारी, खासगी अथवा ग्रामीण बँकेमध्ये खाते असल्यास पोस्टाच्या माध्यमातून घरबसल्या पैसे काढण्याची व्यवस्था आहे. आधार क्रमांक लिंक असल्यास 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. या सेवेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात दिसून आला. आधारचा वापर करून 11 कोटी 28 लाख 72 हजार रुपयांची रक्कम नागरिकांपर्यंत घरपोच करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हय़ात पोस्टाचे बेळगाव व चिकोडी असे दोन विभाग आहेत. बेळगाव विभागात 302 पोस्ट सेवा केंद्र तर चिकोडी विभागात 387 सेवा केंद्र सुरू आहेत. एकूण 490 शहर व ग्रामीण भागात डाकसेवक सेवा पोहचवित आहेत. खाते उघडणे अत्यंत सोपे असून संपूर्ण व्यवहार हे डिजिटल आणि बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येत असतात.
पोस्ट कार्यालयात आरडी, सुकन्या समृद्धी योजना व पीपीएफ या सेवा देण्यात येत होत्या. मात्र इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमुळे अनेक आर्थिक व्यवहार करणे शक्मय झाले. या बँकेने आरटीजीएस, एनइएफटी व डिजिटल पेमेंट या सुविधा देखील दिल्या आहेत. या बँकेमध्ये पासबुक नसून संपूर्ण डिजिटल माहिती ग्राहकाच्या मोबाईलवर देण्यात येते. प्रत्येक पोस्ट कार्यालयात ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
घरबसल्या काढता येतात पैसे
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ग्राहकांना डोअर स्टेप सुविधा पुरविण्यात येत असते. ग्राहकाला घरच्या घरी 10 हजार पर्यंतची रक्कम काढता येते. बायोमॅट्रीक ऍपचा वापर करून ही रक्कम काढली जाऊ शकते. पोस्टमन ग्राहकाच्या घरी जाऊन बायोमॅट्रीक पद्धतीने रक्कम देतो. महिला, पेन्शनर्स धारक व वृद्ध व्यक्तींना पोस्टाची ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरू लागली आहे.
मनिष कुमार तिवारी (शाखाधिकारी, इंडियन पोस्ट पेमेंट बँक)
लॉकडाऊनच्या काळातही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे काम सुरू होते. नागरिकांना रकमेची गरज असल्यास आधार क्रमांकाच्या मदतीने 10 हजारांपर्यंतची रक्कम घरबसल्या काढता येत होती. त्यामुळे आधार अनबल पेमेंट सिस्टमद्वारे 11 कोटी 28 लाख रुपये ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.