कडोली परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने समस्या
वार्ताहर / कडोली
कडोली येथे वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून विजेअभावी टीव्ही संच बंद होत असल्याने लॉकडाऊनकाळात वेळ कसा घालवायचा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे.
कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून कोरोना संसर्गामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे आजारी रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी घरातच राहणे पसंत केले आहे. यासाठी घरात राहून वेळ घालविणे तितकेच महत्त्वाचे आहे. मनोरंजनासाठी आणि वेळ घालविण्यासाठी टीव्ही संच चालू राहणे गरजेचे आहे. परंतु, गेले पाच-सहा दिवस झाले कडोली, जाफरवाडी, गुंजेनहट्टी, देवगिरी गावात खंडित वीजपुरवठय़ाने तर कळस गाठला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित करून हेस्कॉमवाले ग्रामस्थांची मजा बघत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डासांचा उपद्रव आणि वाढती उष्णता यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना पंख्याच्या वाऱयाशिवाय रात्रभर झोपही लागेना आणि टीव्हीशिवाय वेळ जाईना, अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे.
दाद मागायची तरी कुणाकडे?
याकडे ग्राम पंचायत सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी? एकीकडे कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासन सर्वांना घरातच रहा, असे सांगते. तेव्हा लॉकडाऊनमध्ये घरच्या कुटुंबाला वेळ घालविण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱयांनी याकडे लक्ष घालून कडोली परिसरातील वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.