आधीच जनता आर्थिकदृष्टय़ा हतबल -नाडकर्णी
वार्ताहर / दोडामार्ग:
जिह्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले. त्यामुळेच लॉकडाऊनसारखे उपाय योजले जात आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. वारंवार होणाऱया लॉकडाऊनमुळे आर्थिक प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजनांची गरज असताना शासन व प्रशासन मनमानी करत जनतेला वेठीस धरत आहे, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली आहे.
त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, आधीच दोन महिन्यांच्या लॉकडाऊनने लहान-मोठय़ा व्यावसायिकांचे आर्थिक गणित मोडले आहे. गोव्यात ये-जा करण्यासंबंधी ठोस निर्णय नसल्याने अनेकांच्या नोकऱया गेल्या. त्यांच्या जगण्याचे हाल झाले. कोरोनापेक्षाही भयंकर स्थिती आर्थिक व्यवस्थेची आहे. त्यावर मार्ग काढायचा सोडून प्रशासन जनतेला वेठीस धरत आहे. प्रश्न काय आहेत याचे भानच नसल्याने प्रशासन आणि सत्ताधारी मनमानीपणे वागत आहेत. पोलीस बळाचा धाक दाखवून प्रशासन जनतेचा भुकेचा, कर्जबारीपणाचा प्रश्न सोडवू शकेल काय? आधीच्या लॉकडाऊननमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, व्यावसायिक, उद्योजकांना आज बँका कर्ज परतफेडीसाठी तगादा लावत आहेत. परिस्थितीचे योग्य भान आणि जाणीव नसल्याने आज सत्ताधारी मजेत मश्गुल आहेत. तर जनता भरडली जातेय. जनतेने दोन महिने कडक लॉकडाऊन पाळून प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. सद्यस्थितीत नजीकच्या काळात उद्योग व्यवसायाचा गाडा रुळावर येणे कठीण दिसते. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासनाने जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. जनता साथ देते, याचा अर्थ ती सहनशील आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. सत्ताधारी पक्ष स्वतःचे अपयश लपविण्यासाठी लॉकडाऊनसारखे अस्त्र वापरून जनतेमध्ये कोरोनासंबंधी भीती निर्माण करत आहे, असेही नाडकर्णी यांनी म्हटले आहे.