लहानपणी 1 ऑगस्ट आला की शाळांमध्ये लोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ निबंध लेखन किंवा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात. बालचमूचा आवडता आशय म्हणजे ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही आणि ज्यांनी शेंगा खाल्ल्या त्यांची नावे सांगणार नाही,’ हा प्रसंग. वरच्या वर्गातली मुलं ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या प्रतिज्ञेवर बोलत-लिहीत. टिळकांच्या कार्याचा आशय आणि महत्त्व मोठेपणी समजले. आज टिळकांची आठवण वेगळय़ा कारणास्तव येते आहे.
इंटरनेटवर शोध घेतला तर लक्षात येईल की विसाव्या शतकाच्या आरंभी भारतीयांचे सरासरी आयुर्मान अतिशय कमी होते. एका आकडेवारी नुसार विसाव्या शतकाच्या आरंभी सरासरी आयुर्मान 24 ते 25 इतकेच होते. स्वातंत्र्यानंतर भारताची आर्थिक स्थिती झपाटय़ाने सुधारत गेली आणि सरासरी आयुर्मान वाढत गेले.
तरुण वयात स्वतः टिळकांची प्रकृती तितकीशी चांगली नव्हती. डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की प्रकृती सुधारायची. त्या दृष्टीने त्यांनी व्यायाम वगैरेवर लक्ष केंद्रित केले. या प्रयत्नांपायी त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले खरे. पण उत्तम प्रकृतीचा त्यांना आयुष्यभर लाभ झाला. मंडाले येथील तुरुंगात हालअपेष्टा सहन करूनही त्यांना शरीराने उत्तम साथ दिली. त्यांचा जन्म 1856 सालचा आणि निधन 1920. उत्तम प्रकृतीने त्यांना (तत्कालीन मापदंडानुसार) दीर्घायुष्य दिले आणि त्यांच्या हातून त्यांच्या हातून वृत्तपत्रकारिता, गणित, गीतारहस्यचे लेखन, स्वातंत्र्याच्या चळवळीत भरघोस योगदान अशी अनेक कामे पार पडली.
हे सगळे आत्ता का आठवायचे.
सध्या कोरोनाच्या साथीने देशभर धुमाकूळ घातला आहे. संसर्गाचा तिसरा धोकादायक टप्पा अवतरला आहे. अशात राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेऊ नयेत असा निर्णय घेतला आहे. मात्र यूजीसी परीक्षा हव्यातच अशा निर्णयावर आज तरी ठाम आहे. कोणाचा विजय होईल हे ठाऊक नाही.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय करावे? ज्यांना स्वतःच्या जिवाचे रक्षण करून परीक्षा देता येईल असे वाटते त्यांच्याबद्दल प्रश्न नाही. ज्यांना अशी खात्री वाटत नसेल त्यांनी एक वर्ष परीक्षा दिलीच नाही आणि मधल्या काळात एखादे व्यावसायिक कौशल्य आत्मसात केले तर?
सगळेजण टिळक होऊ शकत नाहीत. पण टिळकांनी दाखवलेल्या मार्गावरून बोध घेऊ शकतात.