मुंबई / ऑनलाईन टीम
देशभरासह राज्यात देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुन्हा लॉकडाउन होणार का, याबबत सर्वसामान्य नागिरांकमध्ये चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे लोकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाउन केला जाईल असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर चर्चा घेऊनच लॉकडाउनसंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे सांगत मुंबई लोकलबाबत मात्र कठोर निर्णय घेण्यात येतील असा इशारा दिला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाउनचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसंच इतर परिणामांचा विचार करुन ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. लॉकडाउन हा खरं तर शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल. यासोबतच कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला. सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.