प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांविषयी सर्व देशवासियांनी कटिबद्ध राहायला हवे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणातून देशवासियांना केले आहे. रविवारी देशात साजरा होत असलेल्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशवासियांनी संबोधित केले.
भारतीय संविधानाने आपल्याला काही अधिकार बहाल केले आहेत. पण, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव या मुलभूत लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे मतप्रदर्शन राष्ट्रपतींनी केले. भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर देशातील अनेक विषय आणि योजनांवर राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात भाष्य केले.
मोदी सरकारच्या विविध योजनांचे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात कौतुक केले. नागरिकांच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानाने खूप कमी दिवसात चांगले यश मिळवले आहे. लोकसहभागाची हिच भावना अन्य क्षेत्रांमध्येही असायला हवी. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून लोकांच्या घराघरात गॅस पोहचला. तसेच काळोख असलेल्या अनेक घरांपर्यंत वीज पोहोचवण्याच्या कामातही सरकारने मोठा पल्ला गाठलेला आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. जम्मू काश्मीरच्या मुद्याचा आधार घेत देशाच्या प्रत्येक भागाचा विकास होणार असल्याचे सुतोवाचही राष्ट्रपतींनी केले. जम्मू काश्मीर, लडाखबरोबरच ईशान्येकडील राज्ये आणि देशाच्या प्रत्येक भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.