बेळगाव / प्रतिनिधी
फाटकावर रेल्वे येण्याच्या दरम्यान गेट पडल्यानंतर होणारी वाहनधारकांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे फाटकाजवळ उड्डाणपूल करण्यात येणार आहे. मात्र दुसरे रेल्वेफाटक ओलांडून खानापूर रोडकडे जाणाऱया रस्त्यावर रेल्वे खात्याने भली मोठी लोखंडी कमान उभी केली आहे.
या ठिकाणी नियोजित उड्डाणपूल उभारणी करण्यात येणार आहे. असे असताना याची उभारणी करण्याची आवश्यकता नव्हती. पण तरीदेखील ही कमान का उभारण्यात आली आहे, असा प्रश्न आता जनमाणसात उभा ठाकला आहे.
ही कमान कशासाठी उभी केली आहे? सध्याच्या परिस्थितीत रेल्वे फाटक बंद असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशाच प्रकारे पहिले रेल्वेगेट व चौथ्या रेल्वे फाटकाजवळ लोखंडी कमान बसविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाला या बाबतीत नेमके काय साध्य करायचे आहे, हेच समजेनासे झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.