सीईटीपीतील गाळ प्रश्न ‘जैसे थे’
प्रतिनिधी/ चिपळूण
लोटे सीईटीपीतील गाळ उपसा एमआयडीसीने थांबवल्यानंतर गेल्या 4 दिवसात त्यातून कोणताही मार्ग निघालेल्क्व नसल्याने गाळाचा प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’ आहे. सीईटीपीने उद्योगांच्या डिस्चार्जवर मर्यादा आणल्याने ईटीपी भरून गेल्या आहेत. आकस्मिक आलेल्या या संकटामुळे काही लहान उद्योगांनी आपले उत्पादन निम्म्यावर आणले आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी तक्रारदार तसेच अधिकारीवर्गाकडून गाळ साठवणूक जागेची पाहणी करण्यात आली.
एकीकडे सांडपाणी व्यवस्थापनामध्ये अमूलाग्र बदल करत आल्याने सध्या लोटे सीईटीपी हा संपूर्ण राज्यात औद्योगिक वसाहतीतील सीईटीपींसाठी आदर्शवत असा प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. असे असतानाच सध्या या प्रकल्पातील साठलेला गाळ काढण्याच्या सुरू असलेल्या कामावर असोसिएशनचे अध्यक्ष व आवाशी सरपंच ऍड.राज आंब्रे यांनी तक्रार केल्यानंतर एमआयडीसीने गाळ उपसा थांबवला. परिणामी रासायनिक उद्योगांकडून सीईटीपीत केल्या जाणाऱया डिस्चार्जवर मर्यादा आणण्यात आली आहे. 3 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होत असताना सध्या केवळ 1 एमएलडीवरच प्रक्रिया केली जात आहे. डिस्चार्ज कमी केल्याने उद्योगांना उत्पादन काढणेही अवघड होऊन बसले आहे. यामध्ये मोठय़ा उद्योगांपेक्षा लहान उद्योगांना मोठा फटका बसला आहे. त्यांची ईटीपीची क्षमता जेमतेम असते. अशातच सीईटीपीने तास, अर्धा तास असा डिस्चार्ज ठेवल्याने लहान उद्योगांनी आपले उत्पादन निम्म्यावर, तर काहींनी त्याहूनही कमी केले आहे.
सीईटीपी गाळ प्रश्नावरून लोटेतील उद्योजकांत सारे काही आलबेल नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्याच्यादृष्टीनेही उद्योगांच्या बैठकावर बैठका होत आहेत. स्थानिकही हा वाद सामोपचाराने मिटावा, या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र गेल्या 2 दिवसांत झालेल्या बैठकांतून फारसे काही निष्पन्न होताना दिसत नसल्याने उद्योजक अधिक धास्तावले आहेत.