अध्याय तेविसावा
भगवंत म्हणाले, जो परमशांती बाळगतो त्याला मोक्ष मिळतो पण कोणत्याही परिस्थितीत शांती बाळगणे केवळ अशक्मय आहे असे उद्धवाचे म्हणणे होते. या उद्धवाच्या बोलण्यावर भगवंत म्हणाले, तू म्हणतोयस तेही खरंच आहे कारण, निंदा, अवज्ञा, उपहास इत्यादि मार्गानी दुर्जनांनी केलेला अपमान जो सहन करेल, त्याला देवच म्हणायला पाहिजे. आत्मज्ञान झालेलं असल्याने तो माझेच रूप झालेला असतो, त्याला कितीही उपद्रव दिले तरी क्रोधाची उसळी येतच नाही. आत्मज्ञान ज्यांना समजत नाही तो कितीही विद्वान असला तरी तो, ही द्वंद्वे सहन करू शकत नाही. समोरच्याच्या बोलण्यातून माणसं जेव्हढी दुखावली जातात तेव्हढी ती प्रत्यक्ष मारलेल्या मर्मभेदी बाणांनीही दुखावली जात नाहीत. अशी दुर्जनाची दुरुक्ति व अपमान करण्याचा उद्धटपणा सोसण्यासाठी लागणारी शांती सामान्य जनांच्या ठिकाणी मुळीच असत नाही.
आपल्याला कुणी काही लागट बोललं तर दूरवरचा विचार करून शांत रहावं असं काही माणसाला वाटत नाही कारण दूरवरचा विचार न करता माणसं लगेचच्या लगेच होणाऱया अपमानाचा विचार करतात आणि आरे ला कारे करण्यात धन्यता मानतात. मुळात मान अपमान हे सगळं धनमानावर अवलंबून असतं आणि हे मनुष्य अनुभवातून शिकतो. अनुभवातून मनुष्य शहाणा होतो पण तो मिळेस्तोवर माणसाचं आयुष्य वाया गेलेलं असतं. त्यासंबंधीची एक कथा तुला सांगतो. उद्धवा! एक संन्यासी होता. त्याला दुर्जनांनी अतिशय उपद्रव दिला असता तो म्हणत असे की, त्यांच्या उपद्रवांनी माझ्या दुष्कर्माचा क्षय होईल. याच आनंदाने तो आपल्या मनात दुर्जनांविषयी क्षमाशील झाला.
आपल्या अंगी असलेला मळ दुसऱयांनी पूर्णपणे धुवून काढला असता जो क्रोधाने तळमळ करीत असतो, तो मूर्ख व केवळ आत्मघातकी होय. लोक ज्यांना दुर्जन असे म्हणतात, त्यांना संन्यासी म्हणतो की, हे माझे स्वजन आहेत. कारण माझ्या दोषांचा नाश ह्यांच्याच धर्मामुळे होत असतो. कोणी समोर निंदा करू लागले असता तो मनामध्ये अतिशय आनंदित होतो. तो म्हणतो की, श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्नच झाला. कारण माझ्या पातकांचा नाश आपोआपच होत आहे. खरोखर अशा विचाराने तो शांतीला कधीही मुळीच ढळू देत नाही. आपली शांती कधीही ढळू द्यायची नाही या निर्णयाप्रत येण्यासाठी त्याने जीवनात बरीच उलथापालथ झालेली पाहिली असते. त्याचे मनःपरिवर्तन कसे झाले ती कथा मोठी ऐकण्यासारखी आहे, नीट लक्ष दे. हा संन्यासी मुळात अत्यंत लोभी होता तोच परिस्थितीच्या रेटय़ाने अत्यंत विरक्त कसा झाला ते सांगतो. अवन्तीनगरात एक ब्राह्मण राहात होता शेती, व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती. तो अतिशय कंजूष, कामी, लोभी आणि रागीट होता. त्याने आपले जातीबांधव किंवा अतिथी यांना कधी गोड शब्दांनीही सुखविले नाही तर मग खाऊपिऊ घालण्याची गोष्ट तर दूरच राहिली! कधीही धर्मेकर्मे न होणाऱया घरात तो राहात असे आणि योग्यवेळी सुद्धा सुखोपभोगांनी स्वतःच्या शरीरालाही सुखी करीत नसे. त्याचा कंजूषपणा आणि वाईट स्वभाव यांमुळे त्याचे पुत्र, कन्या, बंधूबांधव, नोकरचाकर, पत्नी इत्यादी सर्वजण दुःखी असत. त्यामुळे ते त्याच्या मनाला बरे वाटेल असे काहीही करीत नसत. इहलोक आणि परलोक अशा दोहोंनाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणाऱया या माणसावर धर्मकर्मांच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागावल्या.
पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळवलेले धनही नष्ट झाले. त्या अधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले, काही चोरांनी चोरून नेले, काही दैवी कोपाने नष्ट झाले, तर काही काळाच्या प्रभावाने नाहीसे झाले. काही इतर माणसांनी घेतले आणि उरलेसुरलेले धन राजाने काढून घेतले. अशा प्रकारे त्याची सर्व संपत्ती निघून गेली. त्याने धर्म जोडला नाही की, सुखोपभोग घेतले नाहीत.
क्रमशः