ऑनलाईन टीम / मुंबई :
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यात उत्फुर्त प्रतिसाद मिळत असून, 35 संघटनांनी यात सहभाग घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. एनआरसी, सीएए, देशातील नवरत्न कंपन्या विकण्याचे सरकारचे धोरण आणि खासगीकरणाविरोधात हा बंद पाळण्यात येत आहे.
देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यातच केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा केला. देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. तसेच देशातील नवरत्न कंपन्या विकण्याचे धोरण यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंददरम्यान शांतता, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
या बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही कार्यकर्त्यांकडून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इतर ठिकाणी मुंबईत या बंदचा जनजीवनावर कोणताही परिणाम दिसत नाही.