प्रतिनिधी / कोल्हापूर
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ताकदीने उतरणार आहे. या निवडणुका पक्ष कोणाशीही युती न करता स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी रविवारी येथे केले.
आयर्विन ख्रिश्चन हॉल, शाहुपुरी येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संघटन, समिक्षा, व समन्वय मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, उपाध्यक्ष डॉ. क्रांती सावंत, प्रदेश युवा आघाडी सदस्य विश्वजित कांबळे, जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, समन्वय समिती सदस्य सोमनाथ साळुंखे, चंद्रकांत खंडाळे, राजरत्न फडतरे, राजरत्न बनसोडे, शाकिर तांबोळी,अस्मिता दिघे, बाबासाहेब कांबळे, कृष्णात भारतीय, अतुल बहुल, पुंडलिक जाधव आदी उपस्थित होते.
रेखा ठाकूर म्हणाल्या, सर्वच राजकीय पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. वंचित बहुजन आघाडी या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या प्रमाणात मतदार कोल्हापूर जिह्यात असूनही येथे उमेदवार का निवडून येत नाही? पक्षाला माननारे लोक असून त्यांनाही पक्षाकडून खूप अपेक्षा आहेत. त्या धर्तीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहीजे.
डॉ. क्रांती सावंत म्हणाल्या, पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने येणार्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज रहावे. गोविंद दळवी म्हणाले, कोल्हापूर जिह्यात बाळासाहेबांना आंबेडकरांना मानणारा मोठा जनाधार आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता दारिद्र्यरेषेखाली का आहे ? इथून पुढे हे चालणार नाही, पक्षाच्या पदाधिकार्यांकडून याचा हिशोब घेतला जाईल.