6143 हेक्टर जागेत 37 लाख रोपांची लागवड : यंदाच्या दमदार पावसाचा फायदा : झाडांभोवती कुंपण घालण्याचे काम हाती
प्रतिनिधी / बेळगाव
विकासाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात जंगलतोड होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याचबरोबर प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी व वनक्षेत्र वाढविण्यासाठी वनखात्याची सातत्याने धडपड सुरू आहे. यंदाच्या हंगामात बेळगाव विभागात वनखात्याने 6143 हेक्टरमध्ये तब्बल 37 लाख रोपांची लागवड केली आहे. बेळगाव तालुक्मयात 18 हजार रोपांची लागवड केली आहे. वनक्षेत्राबरोबर विविध रस्त्यांवर, सरकारी जागेत व खुल्या जागेत ही लागवड करण्यात आली आहे.
वनविभागाने नुकत्याच केलेल्या पाहणी अहवालानुसार 90 टक्के झाडे सुस्थितीत असल्याची माहितीही खात्याने दिली आहे. दमदार पावसामुळे वृक्षांची वाढ जोमात झाली असून जगलेल्या झाडांभोवती ट्री गार्ड (कुंपण) लावण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या वृक्षांचे संरक्षण करून त्यांची संख्या वाढविण्यासाठी वनविभागाची धडपड सुरू आहे.
जिल्हय़ात सर्वाधिक वनक्षेत्र हे खानापूर तालुक्मयाला लाभले असून यामध्ये जांबोटी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी जंगलभागात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. अशा ठिकाणी कुंपण, वनतळी बांधण्यात आली आहेत. विविध ठिकाणी लागवड केलेल्या रोपांची उत्तम वाढ व्हावी, यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर झाडाभोवती लोखंडी व बांबूचे कुंपण घालण्यात येत आहे. लहान रोपांची वाढ 10 ते 12 फुटांपर्यंत झाली असून वन्य प्राण्यांपासून रोपांचे संरक्षण व्हावे, यासाठी झाडाभोवती कुंपण घालण्यात येत असल्याची माहिती खात्याने दिली आहे. रस्त्यांबरोबर व इतर खुल्या जागेत लावलेल्या झाडांची देखभाल केली जात आहे. दरम्यान, डोंगरांना किंवा वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्रात वणवा लागू नये, याकरिता वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये जनजागृती केली जात आहे.संवर्धनासाठी कठोर अंमलबजावणी करणार
वनविभाग वृक्ष संवर्धन करून झपाटय़ाने झाडांची संख्या वाढवत असताना दुसरीकडे मात्र विकासाच्या नावाखाली वृक्षतोड सुरू आहे. एका बाजूला पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपाय सुरू आहेत. दुसरीकडे वृक्षतोडीचे नवे संकट वनविभागासमोर आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती वनखात्याने दिली आहे.