प्रतिनिधी / कोल्हापूर
लॉकडाऊनच्या काळात घरगुती वीज बिले थकली आहेत. मात्र थकबाकीच्या कारणाने कोणाचीही वीज जोडणी तोडली जाणार नाही. असे आश्वासन मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळास दिले. तथापि महावितरणकडून थकबाकीचे हप्ते बांधून देण्यात येत आहेत. त्यानुसार वीज बिल भरुन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले परिणामी सामन्य जनतेचे अर्थकारण कोलमडल्याने घरगुती ग्राहकांना वीज बिले भरता आली नाहीत. थकबाकी वाढली. कोरोना काळातील वीज बिले माफ करावीत अशी मागणी करीत कृती समितीने आंदोलन हाती घेतले होते. याबाबत महावीतरणला निवेदनही दिले होते. याचा निर्णय होण्यापूर्वीच उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बिले माफ होणार नाहीत. असे स्पष्ट केल्यानंतर ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच मुद्यावरुन गुरुवारी नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांची भेट घेवून चर्चा केली यावेळे त्यांनी वरील आश्वासन दिले.
शिष्टमंडळात निवासराव साळोखे, शेतकरी संघाचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील भुयेकर, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, समाजीक कार्यकर्ते दिलीप देसाई, ऍड. बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील, ऍड. सतीश नलवडे आदींचा समावेश होता.
वसुलीसाठी त्रास नाही, पण सहकार्य करावे
कोल्हापूर विभागाची एकुण थकबाकी 2503 कोटी आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांची कोल्हापूर जिल्ह्याची 157 तर सांगली जिल्ह्याची 264 कोटी अशी 421 कोटी थकबाकी आहे. यामधील लॉकडाऊन काळातील कोल्हापूरची केवळ पाच कोटी थकबाकी आहे. महावितरणकडून वसुलीचा तगादा लावण्यात आला नाही. परंतु वीज बील भरण्यासाठी जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांना याचा कोणताही त्रास होणार नाही. जनतेने सहकार्य करावे. असे प्रभाकर निर्मळे मुख्य अभियंता महावीतरण यांनी आवाहन केले आहे.