कोरोनाचा हा काळ आपल्या प्रत्येकासाठीच खूप कठीण आहे. दुसर्या लाटेचा फटका अनेकांना बसत असून आप्तांना गमावण्याचं दुःख खरंच खूप मोठं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रूग्ण शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही कमकुवत होतो. कोरोनातून बरं झाल्यानंतरही त्या दिवसांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नाहीत. यामुळे मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. कोरोनाकाळातल्या वाईट गोष्टी मागे सारत नव्या आयुष्याला कशी सुरूवात करता येईल याविषयी…
- डोक्यातले वाईट विचार प्रयत्नपूर्वक दूर करता येतात, असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. असे विचार येऊ लागल्यानंतर मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. मुळात वाईट विचार येऊच देऊ नका. डोकं रिकामं ठेवा. या पद्धतीने वाईट विचारांना तिलांजली देता येईल.
- काही गोष्टी विसरण्यासाठी मेंटल ब्लॉकिंग आवश्यक आहे. डोक्यातल्या वाईट विचारांना सातत्याने नाकारा. असं सतत करत राहिल्याने काही काळानंतर वाईट विचार दूर जाऊ लागतील.
- वाईट विचारांना नकार देऊन भागणार नाही. सोबतच तुम्ही काहीतरी नवं करायला हवं. नव्या, चांगल्या विचारांना प्रवेश द्यायला हवा. आयुष्यातल्या चांगल्या आठवणींना उजाळा द्या. गमतीशीर प्रसंग आठवा.
- मनात वाईट विचार येऊ लागल्यानंतर तातडीने दुसरं काम सुरू करा. मोबाईल हातात घ्या. चक्कर मारायला घराबाहेर पडा. नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींना फोन करा.
- सकारात्मक विचार मांडणारी पुस्तकं वाचा. तसंच नकारात्मक लोकांपासून लांब रहा.