प्रतिनिधी/ वाई
राज्यात आलेल्या निसर्ग चक्री वादळाने व मुसळधार पावसाचे संकटाचा फटका वाई तालुक्यामध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस व सोसाटय़ाचा वा-याच्या रुपात जाणवत होता . या वादळाने तालुक्यात नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होताच वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी तालुक्यातील सर्व गावांच्या गावकामगार तलाठी व सर्कल ऑफिसर, कोतवाल, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना या येणा-या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन करून गावोगावच्या वरील अधिका-यांनी गावातून रिक्षा व कचरा गाडीच्या ध्वनिक्षेपकावरून ग्रामीण जनतेला येणा-या वादळासह मुसळधार पावसाची माहिती दिली होती. त्यामुळे गावागावातील नागरिक या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले होते. त्यामुळे या चक्री वादळाचा थराराचा थोडासा भयभीतव सतर्क अनुभव तालुक्यातील ग्रामस्थांनी घेतल्याने तालुक्यामध्ये फार कमी प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद झाली आहे . त्याचबरोबर वाई तालुक्यातील विद्युत मंडळाचे विविध गावांच्यामध्ये 10 ते 15 खांब पडून तारा तुटल्याने व विद्युत वाहिन्यांवर सोसाटय़ाचा वारा व मुसळधार पावसाने अनेक झाडे व फांद्या कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता . तो पूर्ववत करण्यासाठी वाईचे उपकार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे यांनी तातडीने विद्युत मंडळाकडे असलेल्या अपु-या मनुष्यबळ व अधिका-यांसह वादळी वा-यामध्ये मुसळधार पावसात विद्युत मंडळाचे कर्मचारी जीवाची बाजी लावून नागरिकांना लाईटचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. तालुक्यातील गावांना खंडित झालेला विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात यश आल्याने नागरिकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण दिसत होते अशी माहिती वाईचे कर्तव्यदक्ष तहसीलदार रणजीत भोसले यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
तालुक्यातील पूर्व भागातील शिरगाव येथील नरेश दिनकर भोसले वय 42 यांची तीस गुंठे जमिनीच्या क्षेत्रात जि-9 या जातीच्या केळीची लागवड केली होती. तेथीलच संदीप महादेव भोसले वय 43 यांनीहि 25 गुंठे केळीची लागवड केली होती आणि रामचंद्र काशिनाथ भोसले यांनी 10 गुंठे जमिनीत केळीची लागवड केली होती. त्याचप्रमाणे संतोष गुलाब भोसले यांची 20 गुंठे क्षेत्रात केळीची लागवड होती. काल दिनांक 3 रोजी शिरगाव ता. वाई या गावामध्ये वरील चौघांच्याही परिपक्व झालेल्या केळीच्या बागांना चक्री वादळाचा तडाखा बसल्याने नरेश भोसले यांचे 40500 रुपयांचे तर संदीप भोसले यांचे 33750 रुपयांचे , रामचंद्र भोसले यांचे 13500 रुपयांचे व संतोष भोसले यांच्या 27000 रुपयांचे केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. याची माहिती वाईच्या तहसीलदारांना समजताच त्यांनी तातडीने ओझर्डे गावाचे सर्कल ऑफिसर नरेंद्र गायकवाड , शिरगावचे तलाठी एम. एस. घंबरे , कृषीसहाय्यक एस. बी. कुंभार व शिरगावचे सरपंच दीपक तोरडमल यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या अधिका-यांनी आज दिनांक 4 रोजी सकाळी वरील नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जाऊन जमीनदोस्त झालेल्या केळीच्या बागांची पाहणी करून त्यांचे पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार हेक्टरी 13500 रुपयाप्रमाणे रक्कम ठरवून पंचनामे करून त्याचा अहवाल वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्याकडे सुपूर्त केला असल्याची माहिती ओझर्डे सर्कल ऑफिसर नरेंद्र गायकवाड यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. तर कवठे ता. वाई येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे चक्री वादळाचा तडाखा बसून पत्रे उडाल्याने दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा केला आहे. कवठे येथीलच राजू पांडुरंग मोरे यांच्या पत्र्याच्या शेडचे पत्रे उडून गेल्याने अंदाजे दहा हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा कवठे गावकामगार तलाठी जे. टी. मोहिते यांनी करून तो हि पुढील कारवाईसाठी तहसीलदारांच्याकडे सुपूर्त केला आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामपंचायत कार्यालय यांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी वाईच्या तहसीलदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी शिरगावच्या नुकसानग्रस्त शेतक-यांनी व कवठे ग्रामस्थांनी केली आहे.