शुक्रवारी 8 बळी, 423 बाधित : बरे होण्याचे प्रमाण 94.99 टक्के
प्रतिनिधी / पणजी
राज्याची वाटचाल हळुहळू कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. गत सुमारे दोन महिन्यांनंतर प्रथमच राज्यातील कोरोना बळींचा आकडा एक अंकी संख्येवर पोहोचला आहे. शुक्रवारी 8 जणांचे बळी गेले आहेत. त्याचबरोबर बाधितांची संख्याही 423 वर आली आहे. बरे होण्याचे प्रमाण 94.99 टक्क्यांवर वर पोहोचले आहे, तर सक्रिय रुग्णसंख्या 5201 एवढी खाली आली आहे.
आतापर्यंत एकूण 153476 जण कोरोनामुक्त झाले असून त्यात गत 24 तासात बरे झालेल्या 819 रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी 3599 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 423 बाधित सापडले. त्यापैकी 50 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 373 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. वर्षभरातील बाधितसंख्या 161576 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी बळी गेलेल्या 8 जणांसह एकूण बळींची संख्या 2899 वर पोहोचली आहे. त्यातील 6 जण गोमेकॉत, दक्षिण जिल्हा इस्पितळात आणि उत्तर गोव्यातील खाजगी रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 28 पासून 82 वर्षे वयोगटातील 3 पुरुष आणि 5 महिला रुग्णांचा समावेश आहे.
फोंडा केंद्रात सर्वाधिक रुग्ण
राज्यातील 33 केंद्रांपैकी फोंडा केंद्रात सध्या सर्वाधिक 548 रुग्ण उपचार घेत आहेत. द्वितीयस्थानी मडगावात 356, चिंबल 311 तर पणजीत 250 रुग्ण आहेत. सध्या सर्वात कमी 27 रुग्ण कासारवर्णेत आहेत. डिचोली, हळदोणे, कासारवर्णे, कोलवाळ, मये व धारबांदोडा या केंद्रांमधील रुग्णसंख्या दोन अंकी संख्येवर आली आहे.