महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोकण आणि गोव्यातही उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. विदर्भ, खानदेश, सोलापूर, नांदेड, परभणीसह मुंबई परिसरात तसंच रत्नागिरी आणि पणजीमध्येही गेल्या दोन दिवसांपासून पारा नेहमीपेक्षा जास्त वर चढताना दिसतो आहे. तर हवामानतज्ञ आणि भारतीय हवामान पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी मुंबई, ठाणे आणि रायगड जिह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा ट्विटरवरुन सोमवारी दिला आहे. मुंबईमध्ये पारा 39 अंश सेल्सीयसवर जाईल. पुढचे दोन दिवस अशीच स्थिती राहील, असा अंदाजही होसळीकर यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे. दुपारच्या आणि अधिक उन्हाच्या वेळेत लोकांनी बाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही समस्या निर्माण झाली आहे असे आपण म्हणतो. पण सर्व शहरांचे तापमान अलीकडच्या काळात हळूहळू वाढताना दिसत आहे. जगभरात कमाल तापमान वाढत असताना आपल्याकडे कमाल आणि किमान दोन्ही प्रकारचे तापमान वाढताना दिसत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. यापूर्वीही पुणे विद्यापीठातील अनेक अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानुसार शहरातील तापमान वाढीमागे अर्बन हिट आयलँड कारणीभूत आहे. शहरी भागात जमिनीच्या वापरात झालेला बदल हे तापमानवाढी मागचे सर्वात मोठे कारण आहे. झाडांची घटत चाललेली संख्या, सिमेंटच्या जंगलाचा वाढता व्यवसाय, वाढते डांबरी रस्ते आणि त्याच्या बरोबरीने विविध रस्ते विकास कामांच्या निमित्ताने होणारे सिमेंटचे रस्ते ही तापमान वाढीमागची महत्वाची कारणे सांगितली जातात. आता कोणत्याही शहरात गेला तर डांबरी रस्ते आणि त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा मिसळून केले जाणारे ‘टिकाऊ’ रस्ते, प्रदीर्घ काळ रस्त्यांवर पुन्हा खर्च करावा लागू नये म्हणून केले जाणारे सिमेंट काँक्रिटचे रस्ते आपल्याला सहज दिसू लागतात. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना असे रस्ते करायला परवडत नाहीत म्हणून शेकडो कोटींची टेंडर्स काढून, लोकांच्यावर टोलचे ओझे लादून का होईना असे रस्ते केले जातात. शहरी भागात वाढणारे हे रस्ते आणि ग्रामीण भागातून नव्याने होत असणारी महामार्गांची कामे पाहिली आणि त्यांच्या शेजारी पूर्वी असलेली वृक्षसंपदा आज नष्ट झालेली पाहिली की येथे पुन्हा कधी हिरवाई फुलणार? आणि कधी इथले तापमान नियंत्रित होणार? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. देशभरात जिथे जिथे रस्ते विकासाची कामे सुरू आहेत तिथे पूर्वीच्या रस्त्यांच्या शेजारी असलेली विशालकाय झाडे तोडून टाकण्यात आली आहेत. रस्ते करतानाच रस्त्याच्याकडेला पुन्हा झाडे लावण्याचे नियम केलेले असतात. मात्र त्याकडे संबंधित कंत्राटदार ढुंकूनही पाहत नाहीत. ज्या प्रशासकीय अधिकाऱयांकडे या नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिलेले असतात तेही आपल्या जबाबदारीकडे कानाडोळा करतात. गेल्या काही वर्षांमध्ये महामार्गाच्या रस्त्यावर येणारे शेकडो वर्षांची झाडे तोडताना अशा अधिकाऱयांना कधीही वाईट वाटलेले नाही. हे दुर्दैवच. ज्या भागामध्ये नागरिकांनी अशी जुनी झाडे तोडण्यास विरोध केला किंवा आंदोलन पुकारले तेव्हा त्यांच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी संवेदनशीलता जपत अधिकाऱयांना रस्त्यांचे नकाशे बदलायला लावल्याची दोन-तीन उदाहरणे सोडली तर जिथे लोकांनी विरोध केला नाही आणि तो मंत्र्यांपर्यंत पोहोचला नाही तिथे झाडांची सरसकट कत्तल झालेली पाहायला मिळाली आहे. बेळगाव सारख्या शहराचे रस्ते विकासाच्या नावाखाली सौंदर्यच नष्ट झाले आहे. रस्त्यांच्या कडेला असणारी झाडांची गर्दी हे बेळगावचे वैभव होते. आज नष्ट झालेले ते वैभव आणि त्यामुळे शहरात फिरताना नागरिकांना जाणवणारी रखरख, त्यामुळे एका शहराची शांततासुद्धा कशी नष्ट पावते त्याचे अत्यंत वाईट उदाहरण म्हणून बेळगाव शहराकडे पहावे लागते. याची यंत्रणेला खंत किंवा फिकीर आहे असे कधीही जाणवत नाही. हीच स्थिती निसर्गाने संपन्न असणाऱया सर्व शहरांची आणि त्यांच्या आसपासच्या परिसराची झालेली आहे. एका आदर्श जीवनशैलीपासून समाज कसा दूर दूर जातो त्याचे अत्यंत हिणकस असे उदाहरण प्रत्येक चांगल्या शहरांमध्ये पहायला मिळत आहे. वाढती लोकसंख्या, नागरिकरणाच्या बुलडोजरखाली माणसाचे आनंदी जगणे सुद्धा चिरडून जाताना दिसत आहे. शहराच्या संस्कृती आणि जीवनशैलीवर हळूहळू होणारे हे अतिक्रमण समजून यायला किंवा संपूर्ण समाजाच्या लक्षात यायला फार वेळ लागतो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि नव्याने पुन्हा सुरुवात करू असा उत्साह असणाऱया मंडळींची एकसंघ कामगिरी घडण्यास पुन्हा प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागते. निसर्गात निष्पर्ण झाडाला चैत्रात पुन्हा पालवी फुटते पण मुळातून काढलेल्या किंवा बुंध्यापासून तोडलेल्या झाडाला सिमेंट किंवा डांबराखाली गाडल्यानंतर झाड तर नष्ट होतेच पण माणसाला त्याचे चटके बसू लागतात. रम्य वातावरण, प्रसन्न सकाळ, पक्षांचा किलबिलाट, तीव्र उन्हाळय़ातही झाडाची सावली निर्माण केलेला गारवा, सायंकाळच्या रम्य वातावरणात झाडावर परतणारे पक्षी आणि अशा निसर्गरम्य वातावरणाने बहरून येणारी संस्कृती या सर्वांना आपण विसरत चाललो आहोत. परिस्थितीचे आणि उन्हाचे चटके सहन करणे हेच आपले प्रारब्ध बनले आहे. मग एके दिवशी कोणीतरी अधिकारी ट्विटरवर तापमान वाढणार असल्याची माहिती देतो आणि मग आपली चिंता वाढते. प्रत्यक्षात निसर्ग आपल्याला रोजच वातावरणातील बदलाचे आणि वाढत्या तापमानाचे संकेत देत असतो. पण, वेळोवेळी त्याकडे केलेले दुर्लक्ष ऐन उन्हाळय़ाच्यावेळी त्रासदायक ठरते. मग कच्छ-सौराष्ट्र, राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून वाढत्या तापमानाने उष्ण झालेले वारे वाहू लागल्यामुळे तापमान वाढले असे तकलादू कारण आपण गृहीत धरतो. असे वारे ठराविक काळच वाहते. पण शहरांचे तापमान विविध कारणांनी वाढतच आहे. प्रत्यक्षात शहराचे तापमान वाढत आहे ते सिमेंटचे जंगल वाढताना, उंचच उंच होताना जमिनीवर तेवढीच वनराई फुलली पाहिजे, वारेही वाहिले पाहिजे यासाठी काळजी घेतली पाहिजे वाऱयालाही कुठेतरी मोकळे वातावरण पाहिजे आणि माणसांनाही कुठे तरी मोकळे होण्याची जागा पाहिजे तरच हे चटके, उन्हाच्या लाटा सहन करून त्यातूनही परिस्थिती सुधारण्याचा विचार होऊ शकेल.
Previous Article90 वर्षांच्या कारमधून पालथे घातले जग
Next Article यजमान पाकची पहिल्या डावात घसरगुंडी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.