कर्नाटकात उन्हाच्या तडाख्याबरोबरच राजकीय घडामोडींनीही वेग घेतला आहे. ग्रामीण भागात पाणीसमस्या निर्माण होऊ लागली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी गेले 64 दिवस सुरू असलेले पंचमसाली समाजाचे आंदोलन तूर्त रहित करण्यात आले आहे. विधानसभेत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे समाजाचे जगद्गुरु जयमृत्युंजय स्वामीजींनी आंदोलन तूर्त रहित केल्याचे जाहीर केले आहे. पुरणपोळी खाऊन समाजबांधवांनी आनंद साजरा केला. पंचमसाली समाजाचा समावेश दोन ए प्रवर्गामध्ये व्हावा यासाठी मकर संक्रांतीपासून पदयात्रा काढण्यात आली होती. बेंगळूर येथे मोठा मेळावा भरविण्यात आला. तरीही सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही म्हणून धरणे आंदोलन हाती घेण्यात आले होते. या मुद्यावर माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी तर राळ उडवून दिली होती. आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री व सरकारविरुद्ध त्यांनी जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आरक्षणासंबंधी येत्या 6 महिन्यात ठोस निर्णय घेण्याचे जाहीर केल्यामुळे तूर्त हे आंदोलन रहित करण्यात आले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याबरोबरच मस्की व बसवकल्याण विधानसभेसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगावात निवडणूक होत आहे. सुरेश अंगडी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कुटुंबातील एखाद्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. पत्नी किंवा त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यासाठी पक्षावर दबाव वाढला आहे. इच्छुकांची संख्याही मोठी आहे. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. काँग्रेसनेही आपला उमेदवार कोण, हे गुलदस्त्यात ठेवले आहे. निजदचा उमेदवार असणार की नाही, याचाही निर्णय व्हायचा आहे. माजी पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांना सीडी प्रकरणात अडकवल्यानंतरच्या काळात या निवडणुका होत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघात रमेश जारकीहोळी व त्यांच्या कुटुंबीयांची पकड नाकारता येत नाही. गोकाक आणि अरभावी मतदारसंघाच्या पाठबळाशिवाय लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणे कठीण जाणार आहे. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असले तरी काँग्रेसला हा आपला बालेकिल्ला परत मिळवायचा आहे. त्यासाठी त्यांचीही धडपड सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे राजकारण तापणार आहे.
सहसा पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार विजयी होतात, असा आजवरचा अनुभव आहे. याच मुद्यावर विधानसभेत आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुराही रंगला. जे सत्तेवर आहेत, त्यांचे उमेदवार पोटनिवडणुकीत विजयी होतात, यात काय नवीन नाही. आम्ही सत्तेवर होतो त्यावेळी आमचे उमेदवारही पोटनिवडणुकीत वरचढ ठरत होते. हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, त्यावेळी खरी परिस्थिती लक्षात येईल, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्ताधाऱयांना डिवचले आहे. आगामी निवडणुकीत आमचीच सत्ता येणार आहे, असे सांगत पुढचे मुख्यमंत्री आपणच आहोत हे सूचित करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. केवळ येडियुराप्पा यांनाच नव्हे तर आपल्याच पक्षातील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱयांसाठीही ही एक सूचना होती. तुम्ही पुन्हा सत्तेवर येणार नाही, याची आपल्याला खात्री आहे. तुम्ही कायमचे विरोधी पक्षनेते असणार, असे सांगत येडियुराप्पा यांनी सिद्धरामय्या यांना टोला लगावला आहे. खरेतर सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र वळणावर येऊन ठेपली आहे. एकमेकांना संपविण्यासाठी वाटेल त्या थराला पोहोचण्याची नेत्यांची तयारी आहे, हे सद्य परिस्थितीवरून दिसून येते.
कर्नाटकात उन्हाच्या तडाख्याबरोबरच राजकीय घडामोडींनीही वेग घेतला आहे. ग्रामीण भागात पाणीसमस्या निर्माण होऊ लागली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हीडियो कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे. सध्या कर्नाटकात लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यु लागू करण्याचा विचार नसला तरी दुसरी लाट थोपविण्यासाठी कडक निर्बंध घालावे लागणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. गेल्या तीन महिन्यात रुग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला नव्हता. चालू आठवडय़ात हा आकडा वाढतो आहे. प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
कर्नाटकात काँग्रेस-भाजपमध्ये वादग्रस्त सीडीच्या मुद्दय़ावरून सुरू असलेली चढाओढ, कोरोना रुग्णसंख्येतील वाढ याबरोबरच आणखी एक मुद्दा ठळक चर्चेत आला आहे. वन्यप्राणी व मनुष्य यांच्यात अधूनमधून संघर्ष होत असतात. कोडगू जिल्हय़ात सध्या एका नरभक्षक वाघाने दहशत माजवली आहे. या वाघाच्या हल्ल्यात तीन कामगारांचे बळी गेले आहेत. अनेक जनावरेही त्याने फस्त केली आहेत. म्हणून या नरभक्षक वाघाला ठार मारण्याची मागणी वाढली आहे. त्यासाठी असलेल्या कायदेशीर अडचणी दूर करून सरकारने नरभक्षक वाघाला संपविण्याचा आदेश दिला आहे. या वाघाच्या शोधासाठी दीडशे अधिकारी, कर्मचारी आणि शार्पशूटर कामाला लागले आहेत. चामराजनगर जिल्हय़ात बिळीगेरी रंगनबेट्टा परिसरात वाघांचे अभयारण्य आहे. के. गुडी परिसरात जंगल सफारीचा आनंद लुटता येतो. गेल्या आठवडय़ात सफारीसाठी गेलेल्या जीपचा दोन जंगली हत्तींनी पाठलाग केल्याचा व्हिडिओ कर्नाटकात व्हायरल झाला आहे. जेव्हा जेव्हा जंगलात मानवी अतिक्रमण वाढते, तेव्हा तेव्हा वन्यप्राणी काँक्रिटच्या जंगलात प्रवेश करतात. सध्या नेमके घडते आहे.