रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 92 वर पोहोचली असून हा जिल्हा शंभरीच्या नजीक गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही एप्रिल अखेरपर्यंत एकच कोरोना रुग्ण होता. ती संख्या आठवर गेली असून अजूनही कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढू शकते.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येमुळे दोन्ही जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांनी हतबलता व्यक्त केली आहे. अपुऱया सुविधा आणि मनुष्यबळाची कमतरता या कारणामुळे हतबलता व्यक्त करणे साहाजिकच आहे. परंतु, चाकरमान्यांना गावी पाठविण्याचा निर्णय घेतलेला नसतानाही चाकरमान्यांच्या जीवावर मुंबई-ठाणे महापालिकेवर सत्ता कायम राखणाऱया आणि 20 पेक्षा जास्त आमदार निवडून येणाऱया राजकारण्यांकडूनच चाकरमान्यांना गावी पाठविण्यासाठी पडद्यामागून सूत्रे हलविली जात आहेत आणि त्यामुळेच प्रशासन हतबल झाले आहे. एप्रिल महिना अखेरपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ात परिस्थिती नियंत्रणात होती. सिंधुदुर्गात एक, तर रत्नागिरीत कोरोना बाधित चार रुग्ण सापडले होते. ते रुग्णही बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने दोन्ही जिल्हे ग्रीनझोनच्या उंबरठय़ावर पोहोचले होते. तिसऱया लॉकडाऊनच्या टप्प्यात काही नियम शिथिल केले गेले. जिल्हय़ाबाहेर जाण्यासाठी ई-पास देण्यास सुरुवात झाली आणि महिनाभर नियंत्रणात असलेली परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. रत्नागिरी जिल्हय़ात तर एप्रिल अखेरपासून चाकरमान्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने कोरोनाचे रुग्णही अचानक वाढले. आज रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 92 वर पोहोचली असून हा जिल्हा शंभरीच्या नजीक गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही एप्रिल अखेरपर्यंत एकच कोरोना रुग्ण होता. ती संख्या आठवर गेली असून अजूनही कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढू शकते. दोन्ही जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यातील बहुतांशी रुग्णांचे कनेक्शन मुंबईच आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे असे आहेत की, या जिल्हय़ातील लोक मोठय़ा प्रमाणावर मुंबई-ठाणे शहरामध्ये कामानिमित्त गेलेले आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात कडक अंमलबजावणी झाल्यामुळे या चाकरमानी मंडळींना गावाकडे येता आले नाही. परंतु ई-पास देण्यास सुरुवात झाल्यावर चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला. लॉकडाऊनच्या तिसऱया टप्प्यात विद्यार्थी, मजूर, यात्रेकरू आणि अपवादात्मक परिस्थितीत गावी जाण्यासाठी पास देण्यास सुरुवात झाली. परराज्यातील मजुरांना विशेष रेल्वे करून गावी पाठविण्यात आले, तेही मोफत. या निर्णयामुळे चाकरमानी मात्र संतापले. परप्रांतीय मजुरांना मोफत रेल्वे सोडली जाते आणि नेहमी निवडणुकीत मदत करणाऱया चाकरमान्यांना सोडले जात नाही, असे सवाल केले जाऊ लागले आणि चाकरमान्यांना सोडण्याचा निर्णय झालेला नसतानाही चाकरमान्यांना ई-पास देऊन सोडले गेले. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ात आज 50 हजाराहून अधिक लोक जिल्हय़ाबाहेरून आले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत होते. त्यासाठी प्रशासनाने रुग्णालयासह शासकीय विश्रागृह, धर्मशाळा, भक्तनिवास ताब्यात घेतले व त्यानंतरही चाकरमान्यांचा ओघ वाढतच राहिल्याने प्रत्येक गावातील शाळाही विलगीकरणासाठी घेतल्या गेल्या. तीही क्षमता संपल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विलगीकरणाची क्षमता संपल्याचे जाहीर करून हतबलता व्यक्त केली. त्याही पुढे जाऊन आता येणाऱया चाकरमान्यांना विलगीकरणाची क्षमता संपल्याने कंटेनमेंट झोनमधून आलेल्यांनाच फक्त संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे आणि इतर ठिकाणाहून आलेल्यांना घरीच विलगीकरण केले जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे नुसती हतबलता नाही, तर चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. इतर राज्यातून व महाराष्ट्र राज्यातून येणाऱया वाढत्या नागरिकांमुळे जिल्हाधिकाऱयांनी राज्यात रेड झोनमध्ये येणाऱया पोलीस उपायुक्त आणि जिल्हाधिकाऱयांना पत्र पाठवून ‘ई-पास देऊ नयेत’ अशी विनंती केली आहे व ‘आपल्या पूर्वसंमत्तीशिवाय पास देऊ नये’ असेही कळविले आहे. परंतु, या पत्राचा परिणाम अजून तरी झालेला दिसत नाही. अजूनही जिल्हय़ाबाहेरील काही नागरिक येतच असून सिंधुदुर्ग जिल्हय़ात येणाऱया लोकांची संख्या 20 हजारावर गेली आहे. ही अधिकृत ई-पासची आकडेवारी आहे. त्यापेक्षाही जास्त लोक आलेले आहेत. दोन्ही जिल्हय़ात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. मनुष्यबळाची कमतरता आहे. दोन्ही जिल्हय़ात कोरोना नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुद्धा नाही. अशा परिस्थितीमुळेच जिल्हा प्रशासनाने हतबलता व्यक्त केली आहे. सिंधुदुर्गात आजपर्यंत कोरोनाबाधित आठ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे, असे म्हटले जाते. परंतु, वस्तुस्थिती वेगळी आहे. कारण कोरोना नमुना तपासणीसाठी इथे लॅब नाही. कोल्हापूरला नमुने तपासणीसाठी पाठवावे लागतात. तिथून गेल्या चार-पाच दिवसापासूनचे रिपोर्टच आलेले नाहीत. त्यामुळे जिल्हय़ात रेड झोनमधून चाकरमानी येऊनसुद्धा त्यांचे स्वॅब घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. पाचव्या, सहाव्या दिवशी स्वॅब घेतले जातात. परंतु चाकरमानी 10-10 दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहूनसुद्धा त्यांचे स्वॅब घेतले नाहीत. कोरोना नमुना तपासणीचे प्रमाण वाढविले तर बाधितांची संख्या वाढूही शकते. दोन्ही जिल्हय़ात परिस्थिती हाताबाहेर गेली असली, तरी जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना रोखले गेल्यास परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते अन्यथा संपूर्ण यंत्रणा कोलमडू शकते.
संदीप गावडे