पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांना विचारला जाब
प्रतिनिधी /मडगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने एकाचवेळी 6 महिन्यांची बिले पाठवून देण्याबरोबर आठ ते दहापट अशी वाढीव बिले आल्याचा दावा करताना या बिलांचे दर बरोबर करून देण्याची मागणी संतप्त झालेल्या दवर्लीवासियांनी आठवडाभरापूर्वी केली होती अन्यथा खात्यावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी पाणीपुरवठा विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांना घेराव घालण्यात आला.
यावेळी स्थानिक रहिवासी आनंद सावंत व अन्य उपस्थित होते. यापूर्वी दर महिन्याला बिले येत असताना दरेकाला पाण्याच्या वापरानुसार पाचशेच्या आंत वा फार तर हजाराच्या आंत बिले येत होती. आता सहा महिन्यांनी बिले आली असून 5 हजारांपासून 11 हजार रुपयांपर्यंतची वाढीव बिले दवर्लीवासियांना आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यापुढे प्रत्येक महिन्याला बिले पाठविण्याची मागणी दवर्लीवासियांनी उचलून धरली.
सहा महिन्यांनी बिले आल्याने ती वाढीव आली आहेत. त्यात त्रुटी आहेत. खात्याने त्यात सुधारणा करून दर महिन्याची वेगळी बिले तयार करून पाठवावीत, अशी मागणी उपस्थितांनी उचलून धरली. विधानसभा निवडणुका आल्याने पाणीपुरवठा खात्याकडे मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे दर महिन्याला बिले पाठविणे शक्मय झाले नाही, असे साहाय्यक अभियंत्यांनी नजरेस आणून दिले. यापुढे नियमित बिले पाठविण्याचे तसेच हप्त्यांनी आणि धनादेशाद्वारे बिले फेडण्याची सोय करण्याचे तसेच बिलांत त्रुटी राहून गेलेल्या असल्यास त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दवर्लीतील पाणी ग्राहकांना देण्यात आले आहे, असे सावंत यांनी सांगितले.