प्रतिनिधी / कोल्हापूर
जून महिन्यात लॉकडॉऊन शिथिल झाल्यानंतर महावितरण कंपनीने माहे मार्च ते मे असे एकत्रित मीटर रिडींग घेऊन त्याप्रमाणे ग्राहकांना तीन महिन्याचे वीज बिल दिले आहे. एप्रिल महिन्यापासून तर वीज दरामध्ये प्रचंढ वाढ केली आहे. ही वाढीव वीज बिले कमी करण्याबाबत महावितरणकडे मागणी करून देखील त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे 13 जुलै रोजी ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱयांच्यावतीने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना निवेदन देणार असून वीज बिलांची होळी करणार आहे. 300 युनिटपर्यंतची वीज बिले शासनाने भरावीत अशी आग्रही मागणी करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
होगाडे म्हणाले, ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्च 2020 पासून देशात तसेच राज्यात लॉकडॉऊन जाहीर झाले. त्यामुळे आजही लोकांच्या हाताला काम नाही. गरीब व मध्यमवर्गीयांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना महावितरण कंपनीने पाठविलेली तीन महिन्यांची वीज बिले कशी भरणार ? त्यामुळे ग्राहकांच्यात असंतोष आहे. महामारीमुळे अनेक नागरीकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनता आर्थिक आडचणीत सापडली असून रोजगार, उद्योग व व्यवसाय संकटात सापडला आहे. केंद्र व राज्य शासनाने सर्व लोकांना घरातून बाहेर पडू नये असे सांगितले. त्यामुळे लोकांना घरातून बाहेर पडता आले नाही. हा त्यांचा दोष नसल्याचे होगाडे यांनी स्पष्ट केले.
विक्रांत पाटील- किणीकर म्हणाले, देशात आर्थिक आणीबाणी सारखी परिस्थिती आहे. अनेक छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशावेळी कुटूंब प्रमुख म्हणून राज्य शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडॉऊन काळातील तीन महिन्यांची घरगुती वीज बिले 300 युनिटस् पर्यंत राज्य शासनाने भरावीत अशी आमची राज्य शानाकडे मागणी आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय घरगुती वीज ग्राहकांच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रातकार्यालय, तहसीलदार किंवा महावितरणचे कार्यालयासमोर वाढीव वीज बिलांची होळी आंदोलन करणार आहोत. सदर आंदोलन करुन तीन महिन्याचे 300 युनिटस् पर्यंत वीज बिल राज्य शासनाने भरावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या नावाने जिल्हाधिकाऱयांना देणार आहे. हे आंदोलन 13 जुलै रोजी एकाच दिवशी 20 जिह्यांमध्ये करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पत्रकार बैठकीस ग्राहक मित्र राजू आलासे, राजेंद्र सुर्यवंशी, बाबासाहेब देवकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर.के.पाटील, समिर पाटील, संपर्क प्रमुख मारुती पाटील, जावेद मोमीन आदी उपस्थित होते.