हद्दवाढीतील रहिवाशांच्या पालिकेत फेऱया
प्रतिनिधी/ सातारा
हद्दवाढ झाल्याने त्रिशंकु भाग आता सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आले आहेत. मात्र अद्याप सोयी-सुविधा चव्हाटय़ावर येवून पडल्या आहेत. यामुळे या भागाचा वाली कोण असे म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. हद्दवाढ झाली तरी विकास कामांचा शुभारंभ कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा शहरातील जकातवाडी, शाहूपुरी, गेंडामाळ नाका, भरोबाचा पायथा, पिरवाडी, चारभिंतीलगतची झोपडपट्टी, केसरकर पेठेतील आंबेडकर नगर हे त्रिशंकु भाग हद्दवाढ झाल्याने सातारा नगरपालिकेच्या क्षेत्रात आले आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या भागात सांडपाणी, लाईट, कचरा, रस्ता अशा मुलभूत सोयी-सुविधा पोहचल्याच नाहीत. अनेक विकासकामांना खिळ बसली. यांचा फटाका येथील रहिवाशांना बसला आहे. हद्दवाढीआधी हा त्रिशंकु भाग होता त्यामुळे नगरपालिका का पंचायत समिती कोण दखल घेणार ? असा प्रश्न येथील रहिवाशांना पडत होता. फक्त निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधी या भागात फेरी मारायचे. आश्वासने देवून सर्व समस्या सोडवणार असा विश्वास रहिवाशांना देत होते. मात्र प्रत्यक्षात या भागात विकास कामांचा कधीच नारळ फुटला नाही. यामुळे हद्दवाढ झाली तरी निवडणुकीनंतरच विकास कामांचा वेध घेता येणार असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे.